मुंबई: पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेची क्षमता वाढवण्याचे व त्यासाठी एक स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे आदेश सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी दिले आहेत. ताशी १०० मिमी पावसाचे पाणी वाहून जाईल, अशा पद्धतीची यंत्रणा उभी करण्यासाठी व मुंबईत लहान मोठी चार नवी पंपिंग स्टेशन कार्यरत करण्यासाठी केंद्रीय गृह खात्याच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून मुंबईला अधिकचा निधी मिळणार आहे, अशी माहितीही शेलार यांनी दिली.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होते. मुंबईला चहूबाजूने समुद्राने वेढले असल्यामुळे समुद्रात भरती असली की पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे मुंबईत उद्भवणारी पूरस्थिती आणि पाण्याचा निचरा याबाबतच्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी २५ जून रोजी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, अमित सैनी, अभिजित बांगर यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबईत सरासरी दरवर्षी १६ ते २० दिवस पाऊस पडतो. हा पाऊस एका तासाला १०० मि. मी पेक्षा अधिक असतो असेही पालिकेच्या अभ्यासात समोर आले आहे. सन २०१४ ते २०१९ या काळात तासाला १३१ मि.मी.पाऊस पडला. मुंबईत २६ जुलै २०२५ रोजी जलप्रलय झाला त्यावेळी सुमारे १ हजार मि. मी पाऊस १६ तासात झाला होता. तर तासाला १३९ मि. मी पावसाची नोंद झाली होती. त्याचवेळी समुद्राला भरती असल्याने प्रचंड पुराचा फटका मुंबईला बसला होता. आता ही वारंवार १०० मि. मी पेक्षा जास्त पाऊस एका तासाला होत असून त्यावेळी भरती असेल्यास पाण्याचा निचरा होत नाही व पूर परिस्थितीला तोंड द्यावे लागते.
मुंबईत २६ जुलै २००५ पूर्वी मुंबईची पावसाचा पाण्याचा निचरा करणारी जी गटारे होती त्यांची क्षमता ताशी २५ मि. मी पाऊस झाल्यावर पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य होती. त्यानंतर गठित केलेल्या चितळे समितीने शिफारस केल्याप्रमाणे त्यात वाढ करुन आता ५५ मि. मी प्रत्येक तासाला पाऊस झाला तर पाणी वाहून नेणारी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. मात्र आता तासाला आता १०० मि. मी पेक्षा जास्त पाऊस होत असल्याने ही क्षमता वाढवण्याची आवश्यकता आहे. याबाबत मुंबई महापालिका करत असलेल्या उपाय योजनांमध्ये लहान मोठी चार पंपिंग स्टेशन नव्याने कार्यरत करण्यात येणार आहे.
धारावीजवळ छोटे पंपिंग स्टेशन
सध्या मुंबईत ९ छोटी पंपिंग स्टेशन असून त्यात वाढ करुन महाराष्ट्र नगर व धारावी टी जंक्शन येथे दोन नवीन छोटी पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. तसेच सध्या ६ मोठी पंपिंग स्टेशन असून त्यामध्ये वाढ करुन मोगरा व माहुल येथे दोन नवी स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे कुर्ला आणि अंधेरी येथे साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, मुंबईच्या पूर परिस्थितीची दखल केंद्रीय गृह खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटीकडून घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यात उपाययोजनांसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मुंबई महापालिकेला उपलब्ध करुन दिला आहे. तसेच शहरातील पूर परिस्थितीचा अभ्यास करुन एक कृती आराखडा तयार करण्यासही सांगितले असून त्याबाबत मुंबई महापालिकेने तयार केलेल्या आराखड्याचा अभ्यास आयआयटीची तज्ज्ञ समिती करत आहे. तासाला १०० मि. मी पेक्षा जास्त पाऊस झाला तरी पाण्याचा निचरा करु शकेल अशी यंत्रणा कार्यरत करण्याचा अहवाल आयआयटीच्या मदतीने तयार करण्यात येणार असून सुमारे ५ हजार कोटींचा खर्च त्यासाठी येईल, असा प्राथमिक अंदाज आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपान दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील तंत्रज्ञानाचा वापर मुंबईतील पाण्याचा निचरा करण्यासाठी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते त्याचाही विचार करुन मुंबई महापालिका नवा आराखडा तयार करीत आहे. मुंबईतील रेल्वे, मेट्रो, एमएमआरडीए यांसह सर्व प्राधिकरणांचा समन्वय साधून व चर्चा करुन हा अहवाल एका महिन्यात तयार करण्यात यावा, असे आदेशही यावेळी मंत्री शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले.