काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेल्या आदेशानंतर आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्याचा चौकशी अहवाल गुरुवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फेरविचारार्थ मांडण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी घेतला. मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे समजते.
या अहवालात सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर या चार माजी मुख्यमंत्र्यांवर तसेच डझनभर सनदी अधिकाऱ्यांवर ठपका आहे. या पाश्र्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने हा अहवाल फेटाळण्याचा निर्णय घेतला होता. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी मांडून तो फेटाळल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यावर विरोधकांनी तोफ डागली तसेच मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेला तडा गेल्याची टीका केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनीही सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करीत अहवालाच्या फेरविचाराचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले होते.