प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईची दिल्ली करु नका असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडवण्यास संमती दिली आहे. मुंबईसह एएमआर क्षेत्रात दिवाळीच्या काळात तीन तास नाही तर रात्री ८ ते १० असे दोन तासच फटाके उडवण्यास संमती असणार आहे.
बांधकामाच्या ठिकाणांहून राडारोडा वाहून नेण्यास १९ नोव्हेंबरपर्यंत बंदी
बांधकामाच्या ठिकाणांहून राडारोडा वाहून नेण्यास घातलेली बंदी १९ नोव्हेंबरपर्यंत कायम. बंदी उठवण्याची महापालिकेची मागणी फेटाळली. प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने मार्च २०२३ मध्ये जाहीर केलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाईल असंही कोर्टाने म्हटलं आहे.
विशेष समिती नियुक्त
हवेच्या प्रदूषणासाठी नेमकी काय कारणे जबाबदार आहेत? याचा अभ्यास करण्यासठी उच्च न्यायालयाने एक समिती नियुक्त केली आहे. प्रत्येक आठवड्याला ही समिती न्यायालयाला अहवाल सादर करणार आहे. तसंच एमएमआर क्षेत्रातील सर्व पालिका, नियोजन यंत्रणा या समितीकडे दररोज प्रगती अहवाल सादर केला जाईल. असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
हवेच्या गुणवत्तेच्या खराब स्थितीकडे लक्ष देण्यासाठी प्राधिकरणांनी एकत्र येऊन पावले उचलण्याची गरज आहे. कागदावर सर्व काही छान आहे; परंतु वास्तविकता वेगळी आहे , असा टोला न्यायालयाने लगावला. आम्हाला यंत्रणा किंवा अधिकाऱ्यांच्या हेतूवर शंका नाही. मात्र, कारवाई केली जात नाही हेही सत्य असल्याचे न्यायालयाने सुनावले. कृती आराखडे आणि इतर मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली गेली असली तरी, या खराब किंवा अपुऱ्या अंमलबजावणीमुळे हवेचा दर्जा वाईट असल्याचे न्यायालयाने नमूद केले.