मुंबई : अंधेरी येथील गोपाळकृष्ण गोखले पूल बांधकामांतील त्रुटींमुळे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. या पुलावरील वाहतूक चिन्ह आणि दिशादर्शक फलकांच्या चुकीच्या उभारणीमुळे गोखले पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नियमानुसार, रस्त्यावरील दिशादर्शक आणि वाहतूक चिन्हे स्पष्ट, समजण्यास सुलभ असणे गरजेचे असते. मात्र, पथदिवे, सिग्नल आणि अन्य खांबामुळे लावण्यात आलेला फलक पाहण्यात प्रवाशांना अडथळे येत आहेत. परिणामी, पुलावर अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपालकृष्ण गोखले पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या मार्गावरील समस्या अद्यापही संपलेल्या नाहीत. काही दिवसांपूर्वी गोखले पुलावरील एस. व्ही जंक्शन परिसराचा बेघरांनी झोपण्यासाठी वापर सुरू केला होता. त्यावरूनही अनेकांनी महापालिकेवर टीका केली.
गोपाळकृष्ण गोखले पूल जीर्ण झाल्यामुळे २०१८ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पुनर्बांधणी रखडल्याने अनेक वर्ष नागरिकांना नवीन पुलाची प्रतीक्षा होती. पुलाची पुनर्बांधणी करताना गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी पुलाची उंची देखील वाढवण्यात आली होती. मात्र, दोन्ही पुलंच्या उंचीत अंतर पडल्याने काम आणखी रखडले. त्यानंतर, पुलाची उंची समतल करण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थांची मदत घेऊन कामाला सुरुवात करण्यात आली. पण सातत्याने त्यात अडचणी येत होत्या. दरम्यान, महापालिकेच्या कामकाजावर टीकाही करण्यात आली.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ११ मे रोजी पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. येथे बसविलेले पथदिवे, खांब आणि दिशादर्शकांमुळे पूल पुन्हा चर्चेत आला आहे. एस. व्ही मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेले दिशादर्शकांआड पथदिवे आणि खांब येत आहेत. वाहनचालकांना प्रवासादरम्यान दिशादर्शक स्पष्ट दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दृश्यमानता वाढविण्यासाठी आणि रस्ता सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी दिशादर्शकाच्या जागेचा आढावा घ्यावा, तसेच, त्यात सुधारणा करावी, अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनने केली आहे.