गर्दीच्या आकडेवारीत दिवा स्थानकाची आठव्या स्थानावर झेप; विक्रोळी, बदलापूर या स्थानकांना मागे टाकले; ठाण्याची प्रवासी संख्याही दोन वर्षांत १६ हजारांनी वाढली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन वर्षांपूर्वी झालेल्या हिंसक आंदोलनामुळे देशभरात पोहोचलेल्या दिवा स्थानकाची दखल आता रेल्वे प्रशासनाला घ्यावीच लागणार आहे. दिवा येथील अनेक नव्या आणि अनधिकृत बांधकामांमुळे येथील लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम दर दिवशी या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येवरही झाला आहे. २०१४-१५च्या तुलनेत २०१६-१७ या वर्षांत दिवा स्थानकाच्या दर दिवसाच्या प्रवासी संख्येत १७ हजारांची भर पडली आहे. २०१४-१५मध्ये मध्य रेल्वेवरील सर्वाधिक प्रवासी संख्येच्या यादीत दहाव्या स्थानकावर असलेल्या दिव्याने २०१६-१७ या वर्षांत आठव्या स्थानावर आगेकूच केली आहे. परिणामी या स्थानकात जादा जलद गाडय़ा थांबवण्याची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वेतर्फे देण्यात आलेल्या आकडेवारीकडे लक्ष दिले असता दर दिवशीच्या प्रवासी संख्येच्या यादीत डोंबिवली सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या स्थानावर असल्याचे दिसते. २०१६-१७मध्ये या स्थानकातून दर दिवशी सरासरी २,४६,१६१ प्रवाशांनी प्रवास केला. त्या खालोखाल ठाणे स्थानकातील दर दिवशीची सरासरी प्रवासी संख्या २,४३,४२३ एवढी होती. मात्र २०१५-१६ या वर्षांशी तुलना केल्यास डोंबिवलीपेक्षा ठाणे स्थानकातील प्रवासी संख्येत जास्त वाढ झाली आहे. या दोन वर्षांमध्ये डोंबिवलीतील प्रवासी संख्या ८६३६ने वाढली, तर ठाणे स्थानकातील वाढ १२,२७० एवढी जास्त आहे.

या आकडेवारीनुसार मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकातील दर दिवशीच्या प्रवासी संख्येत कमालीची घट झाली आहे. २०१४-१५मध्ये या स्थानकातून दर दिवशी सरासरी १,६१,११३ प्रवासी प्रवास करत होते. २०१६-१७ या वर्षांत ही संख्या १,४१,३८७ एवढी आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात वाढलेल्या कॉर्पोरेट कंपन्या व सरकारी कार्यालये, दक्षिण मुंबईतून या भागात स्थलांतरित होणारी कंपन्यांची कार्यालये यांचा परिणाम या प्रवासी संख्येवर झाल्याचे निरीक्षण रेल्वे अधिकारी नोंदवतात.

वांद्रे-कुर्ला संकुलातील या नव्या कार्यालयांचा परिणाम कुल्र्याऐवजी शीव येथील प्रवासी संख्येवर जास्त झाला आहे. तीन वर्षांमध्ये कुर्ला स्थानकातील दर दिवशीची सरासरी प्रवासी संख्या फक्त चार हजारांनी वाढली असली, तरी शीव स्थानकातील प्रवासी संख्येत साधारण आठ हजारांनी वाढ झाली आहे. २०१४-१५मध्ये ७५,०८० असलेली शीव येथील दर दिवसाची प्रवासी संख्या २०१६-१७ या वर्षांत ८३,०३७ एवढी आहे. विशेष म्हणजे या तीन वर्षांत प्रवासी संख्येत सर्वाधिक वाढही दिवा स्थानकातच झाली असून २०१४-१५च्या तुलनेत १७ हजार अधिक प्रवासी या स्थानकातून दर दिवशी प्रवास करत आहेत. त्याखालोखाल ठाणे स्थानकात १५,५९७ प्रवासी वाढले आहेत.

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy crowd at dombivli railway station
First published on: 08-04-2017 at 00:26 IST