मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकारने मुंबई आणि राज्याच्या विकासाला गती दिली आहे. केंद्र सरकारच्या मदतीने मुंबईत सात लाख कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.डबल इंजिन सरकारच्या काळात मुंबई आणि राज्याच्या विकासाची गती वाढली आहे. मोदी सरकारच्या ११ वर्षांतील विकासकामांना उजाळा देत शहा यांनी आगामी मुंबई महानगरपालिका तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराचा नारळच एक प्रकारे फोडला.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर’च्या मुख्यालयाचे उद्घाटन आणि शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात अमित शहा बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी आदी उपस्थित होते.
शहा म्हणाले, दहा वर्षांपूर्वी मुंबईची अवस्था बिकट होती. जीर्ण घरे, वाढलेली लोकसंख्या, झोपडपट्ट्या आणि वाहतूक कोंडीने मुंबईकर त्रस्त झाले होते. तत्कालीन यूपीए सरकारने मुंबईला तिच्या नशिबावर सोडून दिले होते. मात्र, केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मुंबईचा चौफेर विकास केला आहे.
शहरात विकासकामांना गती
मोदींच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात मोठे परिवर्तन झाले आहे. मोदींच्या कार्यकाळात मुंबईत सात लाख कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक झाली आहे. मुंबईत दीड लाख कोटी रुपये खर्चून ३३७ किलोमीटर लांबीच्या मेट्रोचे काम सुरू आहे. अटल सेतू १७ हजार कोटी रुपये, सागरी मार्ग १३ हजार कोटी रुपये तसेच इतर योजनांचा समावेश आहे. झोपडपट्टी पुनर्विकासावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. पण, मी विरोधकांना विचारतो, तुम्ही तुमच्या दहा वर्षांत काय केले. तुम्ही हे केले असते तर देवेंद्र फडणवीस यांना काहीच करायला राहिले नसते.
मुंबईसारखाच राज्याचा विकासही गतीने सुरू आहे. राज्यात ११ वंदे भारत रेल्वे सुरू झाल्या आहेत. १२८ रेल्वे स्टेशन नव्याने तयार केली, मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेट्रो सुरू केली. शिर्डी आणि सिंधुदुर्ग विमानतळ सुरू केले. ६० हजार कोटी रुपये खर्चून समृद्धी महामार्ग तयार केल्याचे नमूद केले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळी क्षेत्रात पुन्हा दुष्काळ पडू नये यासाठी पाणी योजना सुरू केल्या आहेत. पाणी दिल्यानंतर शेती, उद्याोग आणि व्यापाराला गती मिळेल. समस्येच्या मुळाशी जाऊन त्या सोडविल्या जात आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.
खरी शिवसेना कोणाची हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले आहे.-अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री