काऊन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (आयसीएसई) कडून घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मुंबईने बाजी मारली आहे. १० वीचा निकाल ९८.५ टक्के तर १२ वीचा निकाल ९६.२१ टक्के लागल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. मुंबईतील स्वयम दास हा दहावीचा विद्यार्थी ९९.४ टक्के मिळवत देशात पहिला आला आहे. तर १२ वीच्या परीक्षेत एकूण ७ विद्यार्थ्यांनी एकसारखे गुण मिळवत पहिले स्थान पटकावले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना आपला निकाल पहायचा आहे त्यांना तो
http://www.cisce.org किंवा http://www.results.cisce.org या वेबसाईटवर पाहता येणार आहे. यावर्षी आयसीएसईची परीक्षा २६ फेब्रुवारी ते १२ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. तर १२ वीच्या परीक्षेत मुलींनी ९७.६३ टक्के मिळवले असून मुलांनी ९४.९६ टक्के मिळवले आहेत. १०वी मध्ये ९८.९५ टक्के आणि मुलांनी ९८.१५ टक्के मिळवले आहेत. १२ वीत पहिल्या आलेल्या ७ विद्यार्थ्यांमध्ये मुंबईच्या लिलावतीबाई पोदार हायस्कूलमधील अभिज्ञान चक्रवर्ती याने बाजी मारली आहे. मोबाईल तुम्हाला मेसेजमार्फतही निकाल समजू शकेल. त्यासाठी ISC Results 2018 किंवा ICSE Results 2018 असे टाईप करुन त्यानंतर युनिक आयडी टाईप करुन तो मेसेज 09248082883 क्रमांकावर पाठवावा लागेल.

मागील वर्षी बोर्डाने हा निकाल २९ मे रोजी जाहीर केला होता. त्यामानाने यावेळी लवकर जाहीर झाला आहे. याआधी १२ वीसाठी ४० टक्क्यांना पासिंग होते ते आता ३५ टक्के करण्यात आले आहे. तर १० वी साठी ३५ टक्क्यांचे पासिंग ३३ टक्के करण्यात आले आहे. १२ वीच्या परीक्षेला यावर्षी ८१ हजार विद्यार्थी बसले होते तर १० वीच्या परीक्षेला १ लाख ८४ हजार विद्यार्थी बसले होते.