मुंबई : हिमालयात राहणाऱ्या नागरिकांचा हिवाळ्यात थंडीपासून बचाव व्हावा, तसेच त्या प्रदेशात इंधनामुळे होणारा कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) एक खास आदिरूप (प्रोटोटाइप) तयार केले आहे. त्यामुळे आता कमी खर्चात रसायनशास्त्राच्या मदतीने वर्षभरासाठी ऊन साठवून ठेवणे शक्य आहे. याचा वापर मुख्यतः हिमालयाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे.
भारताच्या उत्तरेला असलेल्या हिमालयीन प्रदेशातील अनेक भागांमध्ये वर्षातील किमान तीन महिने तापमान गोठणबिदूंच्या खाली उतरते. अशा वेळी हिमाच्छादित प्रदेशातील नागरिक बहुतांशी डिझेल शेगडीचा वापर करतात. मात्र, यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिझेल शेगडीचे कार्बन उत्सर्जन अधिक असते तसेच त्यासाठी लागणारे इंधनही महाग असते. यालाच पर्याय म्हणून आयआयटी मुंबई येथील संशोधकांनी रसायनशास्त्राच्या मदतीने सूर्याचे ऊन वर्षभरासाठी साठवून ठेवण्यासाठी उष्मा रासायनिक साठवण हा पर्याय पुढे आणला आहे. यामुळे डिझेलमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
कसा साठवला जाणार सूर्यप्रकाश ?
या अभ्यासाद्वारे संशोधकांनी स्ट्रॉन्शियम ब्रोमाइड या संयुगांचा वापर करून सूर्यप्रकाशाचा उष्मा-रासायनिक साठा करता येणार असल्याचे म्हटले आहे. ज्याप्रमाणे बॅटरीमध्ये वीज साठवली जाते त्याचमाणे उष्मा-रासायनिक संचयक (थर्मो-केमिकल स्टोरेज) रासायनिक ऊर्जेच्या स्वरूपात ऊर्जा साठवून ठेवतो. यात सौरऊर्जा हवा संकलकांचा (सोलर थर्मल एयर कलेक्टर) वापर करून उन्हाळ्यात उष्णतेच्या साहाय्याने हवा गरम होऊन स्ट्रॉन्शियम ब्रोमाइड गरम होते आणि त्यांनतर प्रक्रिया होऊन तयार झालेल्या मोनोहायड्रेट क्षारामध्ये शोषून घेतलेली सौर ऊर्जा रासायनिक विभवाच्या स्वरूपात साठवली जाते. थंडीच्या दिवसात या ‘प्रभारीत’ क्षारावरून आर्द्र हवा सोडली असता उलट प्रक्रिया घडून वातावरण उबदार राहण्यास मदत होते.
यात एका वेळेला ५०० किलोवॉट-तास पुरेल इतकी ऊर्जा साठविण्याची रचना केलेली आहे. डिझेलपासून वीजनिर्मिती करायची असल्यास कार्बन दंडासह ७८ रुपये प्रति किलोवॅट-तास इतका खर्च येतो, तर उष्मा रासायनिक प्रणाली याच्या अर्ध्या किंमतीत उपलब्ध होते. यामुळे खर्चाचीही बचत होणार आहे. तसेच स्ट्रॉन्शियम ब्रोमाइड अधिक ऊर्जाघन, अविस्फोटक आणि पर्यावरणासाठी सुरक्षित असल्याने याचाही फायदा होणार आहे.
या पद्धतीचा वापर करून ऊर्जा दीर्घकाळ साठवणे शक्य आहे तसेच ऊर्जा स्थिर असल्याने कमी न होता खूप काळ टिकून राहते, अशी माहिती या शोधनिबंधाचे लेखक डॉ. रुद्रदीप मुजुमदार यांनी दिली. तर अभ्यास गटाचे प्रमुख आयआयटी मुंबईचे डॉ. संदीप कुमार साहा म्हणाले की, ‘यातील प्रत्येक संचयकाचा आकार हा दोन एलपीजी सिलेंडर इतका असून त्याची वाहतूक आणि पुनःप्रभारण (रिचार्ज) करणे सहज शक्य आहे.’ भविष्यात थंड प्रदेशात तैनात असलेल्या सैन्याला वर्षभर प्रदूषणमुक्त उष्मन प्रणाली उपलब्ध करून देऊ शकतील असे उष्मासाठा उपायही संशोधकांकडून विकसित केले जाणार आहेत.