मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली असून शुक्रवारी दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. अनेक भागात शनिवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचबरोबर राज्यातही पावासाचा जोर वाढला असून रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मागील काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. शहर आणि उपनगरात शुक्रवारी सकाळपासून हलक्या सरी बरसत होत्या. त्यानंतर मध्यरात्री पावसाचा जोर वाढला. अनेक भागात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, गेल्या २४ तासांत म्हणजेच शुक्रवारी सकाळी ५.३० ते शनिवारी सकाळी ५.३० दरम्यान विक्रोळी येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. येथे २४८.५ मिमी पाऊस नोंदला गेला. त्याखालोखाल सांताक्रूझ येथे २३२.५ मिमी, शीव २२१ मिमी, जुहू २०८ मिमी, वांद्रे १७३ मिमी, भायखळा १५८.५ मिमी, चेंबूर १२७.५ मिमी आणि कुलाबा येथे ७०.४ मिमी पावसाची नोंद झाली. ऑगस्टचा पहिला पंधरवडा कोरडा गेल्यानंतर आता पाऊस कोसळू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
अति मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर भागात रविवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या कालावधीत अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल. याचबरोबर काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
कमी दाब क्षेत्र
बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. रायगड जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उर्वरित भागात विजांसह पावसाची शक्यता आहे. उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेरपासून, कोटा, रायपूर, उत्तर आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाब क्षेत्राच्या केंद्रापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रात गुजरात आणि कोकणाच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा ते कमी दाबाच्या केंद्रापर्यंत ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे.
आज पावसाचा अंदाज कुठे
अतिवृष्टी (रेड अलर्ट) : रायगड.
अतिमुसळधार पाऊस (ऑरेंज अलर्ट) : मुंबई, ठाणे, पालघर रत्नागिरी, पुणे घाट परिसर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
उर्वरित भागात विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) वर्तविण्यात आली आहे.