मुंबई : राज्यात जूनच्या सुरुवातीपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस कोसळत होता. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासून उघडीप दिली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर साधारण शनिवारपासून संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला. मुंबईतही शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली. रविवार आणि सोमवारी पावसाने झोडपून काढले. सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्याने राज्यात सर्व ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, पुढील चार ते पाच दिवस कोकणातील काही भागात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, मोसमी वाऱ्यांची सोमवारी वाटचाल सुरू झाली असून संपूर्ण कोकण, मध्ये महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा बहुतांश भाग मोसमी वाऱ्यांनी व्यापला आहे. मोसमी वाऱ्यांनी प्रगती केल्यानंतर कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील दोन ते तीन दिवस रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर पुणे, कोल्हापूर, सातारा या भागातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर अकोला, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, वाशिम आणि यवतमाळमध्ये गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकणात मुसळधार
कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्या. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक आहे. पावसाचा सर्वाधिक फटका संगमेश्वर, राजापूर या दोन तालुक्यांना बसला आहे. संगमेश्वरमधील शास्त्री नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे रामपेठ बाजारपेठ जलमय झाली. तसेच संगमेश्वर- नायरी मार्गावर कसबा येथे पुराचे पाणी आले होते.
मध्य महाराष्ट्रतही जोर
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. पश्चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यात पावसाचा जोर होता. पंचगंगा नदीच्या पात्रात सोमवारी वाढ झाल्याने राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. राधानगरी धरणातून २५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण
मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीस पोषक वातावरण असल्याने पुढील दोन दिवसांत उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेशचा आणखी काही भाग, विदर्भाच्या उर्वरित भागासह संपूर्ण महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशाचा उर्वरित भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या अन्य भागात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.