मुंबई : अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलाच्या व्यसनाला कंटाळून गोरेगाव येथे पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र त्याच्या मुलाने पिताच्या मृत्यूनंतर संपत्ती आणि पैशांसाठी आजीचाही छळ सुरू केला. सदनिका (फ्लॅट) नावावर करावी, त्याचे पैसे द्यावे यासाठी तो आजीला त्रास देऊ लागला. हा छळ असह्य झाल्याने आजीने गोरेगाव पोलीस ठाण्यात नातवाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नातवाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गोरेगाव येथील रहिवासी संजय राजपूत (५५) आई स्मिता राजपूत (७६) आणि पत्नी, तसेच दोन मुले आदित्य (२७) आणि गौरव (२५) यांच्यासह रहात होते. त्यांच्या दोन्ही मुलांना अमली पदार्थांचे व्यसन होते. मोठा मुलगा आदित्य पूर्णपणे अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. तो काहीच कामधंदा करीत नव्हता. तो सतत घरात भांडण करीत असे. दोन्ही मुले अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने संजय राजपूत प्रचंड नैराश्यात होते. त्याच नैराश्यात त्यांनी २९ मे २०२५ रोजी गोरेगाव येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
पैशांसाठी आजीचा छळ
पित्याच्या मृत्यूनंतरही मुलगा आदित्य याचे डोळे उघडले नाहीत. उलट तो अधिक आक्रमक आणि हिसंक झाला. त्याने संपत्तीसाठी आजी स्मिता राजपूत (७६) यांना त्रास देण्यास सुरवात केली. आदित्य आजीकडे सतत पैशांची मागणी करू लागला. धमकावून तो आजीकडून पैसे घेत होता. त्याने आजीच्या बॅंक खात्यातील ५ लाख रुपये बळजबरीने काढून घेतले होते. नातवाच्या त्रासाला कंटाळून स्मिता राजपूत मुलीकडे राहण्यासाठी गेल्या. पंरतु तिथेही आदित्य पोहोचला आणि त्यांना त्रास देऊ लागला.
सदनिकेसाठी आजीला धमकावले
गोरेगावच्या सिध्दार्थ नगर येथील जागृती अपार्टमेंटमध्ये त्यांची एक सदनिका (फ्लॅट) होती. दोन्ही नातू अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने स्मिता राजपूत यांनी ही सदनिका शिवम बिल्डरला विकून टाकली. त्यामुळे त्यांचा नातू आदित्य अधिकच चिडला. या सदनिकेचे सर्व पैसे देण्याची मागणी त्याने केली. मात्र नातू हे पैसे नशेसाठी खर्च करण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी ते दिले नाहीत. त्यामुळे तो आजीला अधिकच त्रास देऊ लागला. आदित्य रात्री-अपरात्री आजीच्या घरी जाऊन शिविगाळ करून धमकावू लागला. तो अमली पदार्थ्यांच्या आहारी गेल्याने कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर हा प्रकार असह्य झाल्याने आजीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आदित्य राजपूत याच्याविरोधात ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालनपोषण आणि कल्याण अधिनियमाच्या कलम २४, तसेच भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३५१ (२) (धमकावणे) आणि ३५२ (सार्वजनिक शांतेतचा भंग करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.