मुंबई: खिचडी गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी सूरज चव्हाण यांच्या ८८ लाख ५१ हजार रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली. टाच आणलेल्या मालमत्तेमध्ये मुंबईतील सदनिका व रत्नागिरीमधील शेत जमिनीचा समावेश आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. ईडीच्या तपासानुसार, महापालिकेच्या पात्रता निकषाचे उल्लंघन करून फोर्स वन मल्टी सर्विसला कार्यादेश मिळवून देण्यात सूरज चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. याप्रकरणात महापलिकेची फसवणूक करून कमी खिचडी पुरवण्यात आली होती. त्याबाबत कर्ज व पगाराच्या नावाखाली चव्हाण यांना गैरव्यवहारातील सुमारे एक कोटी ३५ लाख रुपये मिळाल्याचा आरोप आहे. ही रक्कम मुंबईतील सदनिका व रत्नागिरीमधील शेतजमीन घेण्यासाठी वळवण्यात आल्याचा आरोप आहे. सूरज चव्हाण यांना ईडीने १७ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने चव्हाण यांच्याविरोधात शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले होते. हेही वाचा : अग्निसुरक्षाविषयक नियमांच्या अंमलबजावणीसाठी निवडणुकांची सबब सांगू नका, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर २०२३ मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. खिचडी वितरणात सहा कोटी ३७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात फसवणूक, फौजदारी, विश्वासघात, कट रचणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंके, सुजीत पाटकर, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागिदार व कर्मचारी, स्नेहा कॅटरर्स, तत्कालीन सहाय्यक आयुक्त (नियोजन), इतर पालिका अधिकारी व संबंधित खासगी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ लावणे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या आधारावर ईडी तपास करीत आहे. याप्रकरणी १८ ऑक्टोबर रोजी सूरज चव्हाण, तसेच खिचडीचे कंत्राटदार अशा एकूण आठ जणांवर छापे टाकण्यात आले होते.