मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील माजी नगरसेवकांची बैठक बुधवारी मातोश्री निवासस्थानी बोलवली होती. गेल्या वर्षभरात माजी नगरसेवकांची एकही बैठक न झाल्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली होती. मात्र तुम्ही पक्षासोबत निष्ठेने राहिलात. तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना दिले. तसेच युती किंवा आघाडी करताना तुम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये निवडणूकीच्या तोंडावर उत्साह निर्माण झाला आहे.

राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व महानगरपालिका व नगरपालिकांमध्ये प्रभागांची रचना करून ती निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने सर्व पालिकांना दिल्यानंतर निवडणुकीच्या कामाला वेग आला आहे. त्यातच राजकीय पक्षांमध्येही बैठकांचे सत्र, कार्यकर्ता मेळावे सुरू आहेत. मुंबई महापालिकेवर गेली सुमारे २५ ते ३० वर्ष सत्ता असलेल्या शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) या दोन गटातीलच ही प्रमुख लढाई असेल. निवडणूकीची रणनिती ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. गेल्याच आठवड्यात मुंबईतील सर्व शाखाप्रमुखांची बैठक पार पडली. त्यातही मतदारांपर्यंत पोहोचा, नागरिकांच्या समस्या सोडवा असे आदेश ठाकरे यांनी दिले. त्यानंतर बुधवारी ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक मातोश्री निवासस्थानी बोलवली होती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी ही बैठक बोलवल्यामुळे शिवसैनिकांमध्ये, इच्छुक माजी नगरसेवकांमध्ये उत्साह आहे.

गेल्यावर्षी जुलै महिन्यात माजी नगरसेवकांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र त्यानंतर नगरसेवकांची एकही बैठक बोलावण्यात आली नव्हती. त्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली होती. एकेक करून माजी नगरसेवक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे आता ठाकरे यांच्याकडे १०० पैकी केवळ ४८ नगरसेवक उरले आहेत. बुधवारी पार पडलेल्या बैठकीला हे सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीला केवळ माजी महापौर किशोरी पेडणेरकर आणि विशाखा राऊत या व्यक्तिगत कारणामुळे उपस्थित नव्हत्या. बाकी सगळे नगरसेवक उपस्थित होते. विशेष म्हणजे आमदारकीची निवडणूक लढवलेले भांडूपचे माजी नगरसेवक रमेश कोरगावकर, आमदार अनंत नर हे देखील या बैठकीला हजर होते. तसेच दहिसरच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरही उपस्थित होत्या. तसेच वरळी, शिवडी, वांद्रे, दहिसर अशा सर्वच विधानसभा मतदारसंघातील सर्वच माजी नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत यांनी संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, तुम्ही आता नगरसेवक नसलात तरी नगरसेवकाप्रमाणेच मतदारांशी संपर्क ठेवा, नागरिकांची कामे करा, पावसाळ्याच्या काळात साथीचे आजार वाढतात. अशावेळी नागरिकांना आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी मदत करा, पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर लक्ष ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी माजी नगरसेवकांशी भावनिक संवादही साधला. ते म्हणाले की, तुम्ही सगळे पक्षासोबत निष्ठेने राहिलात. तुम्हाला मी वाऱ्यावर सोडणार नाही. शाखास्तरावरील बैठकीला तुम्हालाही बोलवले जाईल, निवडणूकीच्या तोंडावर कोणत्याही पक्षाशी युती किंवा आघाडी केली तरी त्याबाबतचा निर्णय तुम्हाला विश्वासात घेऊनच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.