मुंबई : वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये मंगळवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीची चौकशी करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आगीच्या चौकशीची जबाबदारी सहआयुक्त डी. गंगाधरण यांच्यावर सोपवली आहे. या चौकशीचा अहवाल सात दिवसांत सादर होण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांना चौकशीचे निर्देश दिले होते.

वांद्रे पश्चिम येथील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये मंगळवारी पहाटे ४ वाजता लागलेली भीषण आग तब्बल २२ तासांनी मंगळवारी मध्यरात्री विझली. मात्र आगीच्या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले. अग्निशमन दलानेही मॉलमध्ये आग इतकी का पसरली याची कारणे दिली आहेत. या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी होणार आहे. पालिका आयुक्तांनी तसे आदेश दिले आहेत. तळघरात तीन मजले, तळमजला आणि वर तीन मजले अशा स्वरुपाचा मॉल या आगीत भस्मसात झाला आहे. सुमारे ८,००० ते १०,००० चौरस फूट क्षेत्र या आगीत खाक आहे. मॉलमधील सुमारे दीडशे ते दोनशे गाळे आणि त्यातील सामान आगाच्या भक्ष्यस्थानी पडले.

आरोपांची राळ…

वांद्रे पूर्व येथील माजी आमदार झिशान सिद्दीकी यांची या मॉलमध्ये मालकी आहे. या इमारतीच्या निर्माणात त्यांचा सहभाग आहे. मॉलला आग लागल्याचे समजताच पहाटेच सिद्दीकी घटनास्थळी दाखल होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अग्निशमन दलावर आरोप केले होते. अग्निशमन दलाच्या बेजबाबदारपणामुळे आग वाढली असा आरोप माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी केला. आम्ही पहाटे ४ च्या सुमारास तेथे पोहोचलो. त्यावेळी तिथे ना पोलीस आले होते ना अग्निशमन दलाचे जवान, ६ वाजता सर्वजण इथे दाखल झाले, असा आरोप त्यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी दिले चौकशीचे निर्देश…

वांद्रे येथे लागलेल्या आगीची अतिरिक्त आयुक्तांच्या पातळीवर सर्वंकष चौकशी करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांना मंगळवारी दिले होते. मॉलमधील सर्व व्यापारी आणि या इमारतीच्या निर्माणात सहभागी असलेले माजी आमदार झिशान सिध्दीकी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्याची उत्तरे मिळणे आवश्यक आहेत असे शेलार यांनी म्हटले होते.

खासदार वर्षा गायकवाड यांचेही आरोप

या घटनेची जबाबदारी कोण घेणार असा सवाल खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. वांद्रे येथील मॉलमध्ये आग लागल्यानंतर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती साधने आणि व्यवस्था होती का ? सर्व अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले गेले होते का ? शेवटची अग्निसुरक्षा तपासणी केव्हा झाली होती ? हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशमन दलाचा दावा….

या प्रकरणी अग्निशमन दलानेही आग विझवण्यासाठी खूप खबरदारी घेतल्याचा दावा केला आहे. तसेच मॉलमधील त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत. इमारतीतील तीन तळघरापैकी एकाही तळघरात हवा बाहेर पडण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे धूर व उष्णता भरपूर प्रमाणात वाढली आणि संपूर्ण मॉलमधील साहित्याचे तापमान झपाट्याने वाढले. इमारतीतील अग्निशमन यंत्रणा सुरू नसणे ही बाब आग पसरण्यास कारणीभूत ठरली असे अग्निशमन दलाचे म्हणणे आहे.