पाणबुडीच्या निर्मितीसाठी विशिष्ट प्रकारचे स्टील वापरण्यात येते. या स्टीलने सागरतळाला असलेला प्रचंड दाब आणि अचानक वाढलेले तापमान सहन करावे, अशी अपेक्षा असते. असे हे हायप्रेशर स्टील आयएनएस सिंधुरक्षकमध्ये झालेल्या स्फोटानंतरच्या अग्निप्रलयात वितळल्याचे शुक्रवारी पहाटे भारतीय नौदलाच्या पाणबुडय़ांच्या लक्षात आले. त्याच वेळेस पूर्णपणे कोळशाप्रमाणे बेचिराख झालेले पाच मृतदेहही हाती लागले.

नौदल मुख्यालयाला हेही लक्षात आले की, एवढी भीषण अवस्था मुख्य आग लागलेल्या भागापासून दूर असलेल्या भागात असेल तर आगडोंब उसळला त्या भागाची तर कल्पनाच न केलेली बरी. ही बाब उघड झाल्यानंतर सिंधुरक्षकमध्ये अडकलेल्या उर्वरित जवानांच्या जीविताची आशा पूर्णपणे मावळल्याचे जवळपास स्पष्ट करणारे प्रसिद्धीपत्रक नौदलातर्फे अधिकृतरीत्या जारी करण्यात आले.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा, आता आपल्या जिवलगाचे अंत्यदर्शनही घेता येणार नाही, या कल्पनेनेच संबंधित नौसैनिकांच्या कुटुंबीयांनी तोवर रोखून धरलेला बांध फुटला आणि संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त झाली!
 हाती लागलेले मृतदेहही ओळखण्यापलीकडचे होते. त्यामुळे ते मृतदेह कुणाचे आहेत, ते निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणी करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लकनाही. हे मृतदेह नौदल रुग्णालय आयएनएचएस अश्विनीमध्ये पाठविण्यात आले आहेत. रात्री उशिरा ते जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार आहेत.

..तोपर्यंत नौदलाचे शोधकार्य सुरूच राहील
*सुरुवातीस सापडलेले दोन मृतदेह आणि पाणबुडीच्या आतमध्ये आढळलेली विदीर्ण परिस्थिती पाहता आता असा ठाम निष्कर्ष काढला जाऊ शकतो की, यापुढे जीवित अवस्थेत कुणीही सापडणे अतिशय कठीण आहे.
*पाणबुडीच्या नियंत्रण कक्षाभोवतीच्या परिसरामध्ये झालेली वाताहत आणि विदीर्णता पाहता पाणबुडीच्या पुढच्या ज्या भागात स्फोट झाले, त्या भागात अडकलेल्या नौसैनिकांचे मृतदेह हाती लागणेही अवघडच ठरावे. कारण स्फोटाच्या वेळचे तापमान एवढे जबरदस्त होते की, त्यामुळे हायप्रेशर स्टीलही वितळून गेले आहे.
*असे असले तरी जोपर्यंत मृतदेह सापडणार नाहीत किंवा मृतदेह सापडण्याची शक्यता पूर्णपणे मावळलेली असेल, तोपर्यंत नौदलाचे शोधकार्य सुरूच राहील.
*सर्वच्या सर्व १८ नौसैनिक आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांशी नौदलाचे अधिकारी सतत संपर्कात असून त्यासाठी कुटुंबीयांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.