भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुंबई महानगर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. दोन दिवसांपूर्वी १० दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड घोटाळा बाहेर काढणार, असा दावा सोमय्या यांनी केला होता. आर्थिक कमाईसाठी लोकांना घाबरवून, कोविड सेंटरमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप सोमय्यांनी केला. किरीट सोमय्या यांनी राज्य सरकार तसंच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. वरळीतील कोविड सेंटरचं काम किशोरी पेडणेकर यांच्या मुलाच्या कंपनीला दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. कंत्राट मिळाल्यानंतर कंपनी तयार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

“उद्धव ठाकरेंच्या सेनेला कोविड सेंटर हे कमाईचे साधन आहे. म्हणून ओमायक्रॉन बाधितांचा आकडा वाढवून सांगतात. वास्तविक त्या २० हजार बाधितांपैकी १८ हजार हे लक्षणे नसलेले आहेत. १ जानेवारीपासून आतापर्यंत ४०० ते ५०० रुग्ण रुग्णालयात दाखल होतात आणि चार दिवसांमध्ये घरी जातात. घाबरण्याची गरज नाही. पण ठाकरे सरकारच्या सेनेला कोविड सेंटर चावण्याचे कंत्राट मिळाले आहे,” असे किरीट सोमय्या म्हणाले.

“खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येतं पण..”; किरीट सोमय्यांच्या आरोपांना किशोरी पेडणेकरांचे उत्तर

“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर किरीट सोमय्या गांजा पिऊन बोलत असल्याचे म्हणतात. हो गांजा पिऊन हे बोलतोय की किशोरी पेडणेकर यांनी स्वतःच्या कंपनीला कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट दिले आहे. मुंबई महापालिकेचे कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट मिळालेल्या कंपनीची स्थापना किशोरी पेडणेकरांनी केली. सध्या त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर ही कंपनी चालवत आहे. वरळी येथील डोममधील कोविड सेंटरचे कंत्राट त्यांच्याकडे आहे. मुंबईतील सहा कोविड सेंटर शिवसेना नेत्यांना मिळाले आहे. आधी कंत्राट दिले गेले आणि त्यानंतर कंपन्या तयार करण्यात आल्या. लोकांच्या जीवाशी खेळण्याचे पाप ठाकरे सरकारने केले आहे,” अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी टीव्ही९ सोबत बोलताना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“घाबरण्यापेक्षा आपण काळजी घेऊया. घाबरवणे हे आमच्या रक्तात नाही आणि आम्हीसुद्धा घाबरत नाही. खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येते. पण परिस्थिती तपासून पाहताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला धाडस दिलं आहे. उद्याच्या मृत्यूला मी घाबरत नाही. त्यामुळे तेवढं धाडस आपण दाखवावे,” असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.