मुंबई : बकरी ईदच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या देवनार पशुवधगृहात विविध सोयी – सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र, प्रत्यक्षात पशुवधगृहात सुविधांचा अभाव असल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच, विरोधी पक्षांनीही पशुवधगृहातील अव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शौचालय, पाणी, स्वच्छताचा आदी सुविधांचा अभाव असल्यामुळे व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. तसेच, वाहनतळाची देखील पुरेशी सुविधा नसल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची गर्दी होत आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर, देशभरातील विविध राज्यातून मुंबईच्या पशुवधगृहात बकऱ्यांसह व्यापारी दाखल झाले आहेत. मात्र, पशुवधगृहात मूलभूत सुविधांची वानवा असल्याचा आरोप व्यापारी करत आहेत. विक्रीसाठी ट्रकमधून आणलेले बकरे पशुवधगृहात वेळेत उतरवले जात नसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचा खोळंबा झाला होता. राजस्थान, उत्तर प्रदेशातून अनेक तासांचा प्रवास करून आलेल्या व्यापाऱ्यांना पशुवधगृहाच्या परिसरातील रस्त्यांवर तासंतास उभे राहावे लागले होते. तसेच, ट्रकमधील बकऱ्यांचेही अतोनात हाल झाले होते. मोकळी जागा आणि पुरेशी हवा न मिळू शकल्याने पाच दिवसांपूर्वी दोन बकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनंतरही अनेक बकऱ्यांचा मृत्यू झाला. बकरे उतरवण्यासाठी पालिका कर्मचारी अधिक पैसे आकारात असल्याचेही आरोप अनेक व्यापाऱ्यांनी केले.

बकरी ईदच्या निमित्ताने यंदा पशुवधगृहात सुमारे दीड लाख बकरे उतरविण्यात आले होते. त्यापैकी सद्यस्थितीत सुमारे ६० बकऱ्यांची विक्री झाली आहे. मात्र, व्यापाऱ्यांची अद्यापही गैरसोय सुरूच आहे. पशुवधगृहात अपुरे मनुष्यबळ, सुरक्षारक्षक, शौचालये, पाणी, स्वच्छता आदींची कमतरता असल्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने केलेल्या सोयी – सुविधांच्या दाव्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. महापालिकेकडून दरवर्षी चोख सुविधा करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, दरवर्षी व्यापारी – ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागतो, असे सामाजिक कार्यकर्ते फैयाज शेख यांनी सांगितले. बाहेरच्या राज्यातून आलेल्या व्यापाऱ्यांना पशुवधगृहात प्रवेश देण्याची प्रक्रिया अत्यंत संथ होती. त्यामुळेच व्यापाऱ्यांसह प्राण्यांचेही हाल झाल्याचेही त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पशुवधगृह व बकरा मंडईतील सुविधांसाठी २५ कोटी रुपयांची केलेली तरतूद कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित करत सुविधांच्या नावाखाली फार मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आमदार अस्लम शेख यांनी केला आहे. तसेच, एवढी अव्यवस्था असतानाही दरवर्षी त्याच कंत्राटदाराला काम दिले जाते. २५ कोटी रुपये खर्च करूनही अद्याप अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज केंद्र उभारण्यात प्रशासनाला यश आलेले नाही, असा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. मंडई परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. त्याच घाणीमध्ये बसून व्यापाऱ्यांना भोजन करावे लागत असून पशुवधगृहातील अनागोंदी कारभाराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.