मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदारयाद्या सदोष असल्याचा महाविकास आघाडी आणि मनसेचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. विरोधकांनी आक्षेप घेतलेल्या मुद्द्यांवर निवडणूक आयोगाकडून तपशीलवार खुलासा करण्यात आला आहे.

विरोधकांच्या आक्षेपांची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी राज्यातील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून मतदार यादीबाबतचे विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले असून मतदारयाद्या अचूक राहण्यासाठी राजकीय पक्षांनाच जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी नेमण्याची सूचना केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदारयादीत काही त्रुटी असल्यास राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधींच्या माध्यमातून या त्रुटी मतदान नोंदणी अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणाव्यात, त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केंद्रनिहाय प्रतिनिधी नेमावेत अशी सूचनाही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांकरिता राज्य निवडणूक आयोगाने १ जुलैपर्यंत अद्यावत असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या वापरण्याचा निर्णय घेतला असून त्या याद्या प्रभागनिहाय विभागून प्रसिद्ध केलेल्या आहेत. तसेच त्यावर हरकती सूचना मागविलेल्या आहेत. त्यामुळे या यादीमध्ये एकाच व्यक्तीची नावे अनेकवेळा असणे, मतदाराचे नांव, वय, पत्ता यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत सबंधित विधानसभा मतदार संघाच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करावा अशी सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यानी केली आहे.

नाशिक मध्य मतदारसंघात एका घरात ८०० मतदार असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला होता. हा परिसर दीड हजार चौरस मीटरचा आहे. या ठिकाणी ७०० निवासी वा अनिवासी बांधकामे आहेत. या घरांना कोणताही क्रमांक नसल्याने मतदारामंसोर समान घराचा उल्लेख करण्यात आल्याचा खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे. अमरावती जिल्ह्यातील वडनेरा मतदारसंघात ४५० मतदारांचे घर क्रमांक शून्य दाखविण्यात आल्याचा विरोधकांचा आक्षेप होता. हे सारे मतदार झोपडपट्टी किंवा पाल टाकून राहतात. त्यांना महानगरपालिकेकडून घर क्रमांक देण्यात आलेले नाहीत. मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी केलेल्या अर्जात घराचा क्रमांक नमूद केलेला नाही. म्हणून त्या ठिकाणी शून्य क्रमांक दाखविण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. अन्य काही आक्षेपांवरही निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे.

राजुरा मतदारसंघातील आरोपांवर मौन

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम आणि राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली, तेव्हा राजुरा मतदारसंघातील मतदारांची वाढलेली संख्या हा मुद्दाही उपस्थित केला होता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजुरा मतदारसंघात अवघ्या १५ दिवसांमध्ये मतदारांची संख्या कशी वाढली याची आकडेवारी सादर केली होती. राजुरातील निवडणूक ही मुक्त आणि मोकळ्या वातावरणात पार पडलेली नाही, असा राहुल गांधी यांचा आरोप आहे. निवडणूक आयोगाने विरोधकांनी उपस्थित केलेले आक्षेप फेटाळताना खुलासा केला आहे. पण राजुरा मतदारसंघाबाबत काहीच मतप्रदर्शन केलेले नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने मागे राहुल गांधी यांचे आरोप फेटाळले होते.