मुंबई: पश्चिम उपनगरात मालाड येथील मामलेतदारवाडीत मुंबई महापालिकेने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले असून तेथील इमारतीच्या संरक्षित भिंतीपासून अडीच मीटरपर्यंतचा भाग रस्ता रुंदीकरणात जाणार आहेत. रस्ता रुंदीकरणाची रेषा काही इमारतींच्या अक्षरश: बाल्कनी आणि बेडरुमधून जात आहे. रहिवाशांची बाजू समजून न घेता सुरू केलेल्या रस्ता रुंदीकरणाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. विकास आराखड्याची इतकी काटेकोर अंमलबजावणी आताच का असा प्रश्नही तेथील नागरिकांनी उपस्थित केली आहे.
मालाड पश्चिम परिसरात गेल्या काही वर्षांपासून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्याच अंतर्गत मामलेतदार वाडी येथेही रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र त्यात मामलेतदार वाडी क्रमांक ६ येथे अंतर्गत गल्ल्यांचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या पी उत्तर विभागाने तेथील रहिवाशांना नोटीसा बजावल्या होत्या. या रुंदीकरणात मैत्री सोसायटी या इमारतीचा खूप मोठा भाग बाधित होतो आहे. तसेच रस्ता रुंदीकरणाची रेषा इमारतीच्या बाल्कनीखालून जाते. त्यामुळे या इमारतीचा बाल्कनीचा भाग तसेच शयनकक्षाचा भागही बाधित होणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी या रस्ता रुंदीकरणाला विरोध केला आहे.
याबाबत मैत्री सोसायटीतील कमलेश देवरुखकर यांनी सांगितले, आमच्या सोसायटीचा खूप जास्त मोठा भाग रस्ता रुंदीकरणासाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. स्थानिक रहिवाशांची बाजू विचारात न घेता पी उत्तर विभागाकडून ही कारवाई मनमानी पद्धतीने रेटण्यात येत आहे. रस्तारुंदीकरण हे रहदारीच्या मुख्य रस्त्यावरील नाही तर गल्लीतील आहे. तेथे फारशी रहदारी नाही. तरीही महानगर पालिका हा आतला रस्ता सव्वा मीटर रुंदीचा करण्यासाठी विशेष आग्रही आहे. त्यात काही विकासकांचे लागेबांधे असल्याची चर्चाही परिसरात आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.
रस्ता रुंदीकरणाचा हा आराखडा ज्या स्वरूपात आहे तेथे रस्ता बांधल्यास तो आमच्या इमारतीच्या सुरक्षेसाठी आणि रहिवाशांच्या जीवितासाठी धोकादायक आहे. आमची इमारत २०१५ साली पूर्णत्वास आली. केवळ दहा वर्ष झालेल्या इमारतीच्या प्रकल्पास मान्यता देताना त्यावेळी या रस्त्याचा विचार महानगरपालिकेने केला नव्हता का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. गेल्या आठवड्यात महापालिकेची यंत्रणा थेट बुलडोझर घेऊन कारवाई करण्यासाठी आली होती. मात्र, रहिवाशांनी विरोध केल्यामुळे कारवाई थांबली. त्यानंतर २ मे रोजी पालिकेच्या एका अधिकाऱ्याने परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी जागा चिन्हांकित केली. सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रस्तावित वळणाचे ठिकाण इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिकांच्या बाल्कनीखालून आणि बेडरुमखालून जात आहे. इतक्या जवळून रस्ता जात असेल तर आमच्या इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच उद्या ही इमारत अनधिकृत ठरू शकते, असा मुद्दा देवरुखकर यांनी मांडला.
आम्ही यापूर्वी २७ डिसेंबर २०२४ आणि १ एप्रिल २०२५ रोजी पालिकेस लेखी पत्र देऊन आक्षेप नोंदवला असून, त्यामध्ये आम्ही नमूद केले आहे की आमच्या इमारतीतील सदस्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही विचारणा न करता हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतरही पालिका अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी आमच्याशी काहीही संवाद साधला नाही, असाही आरोप रहिवाशांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नवीन विकास आराखडयानुसार सर्वच रस्ते हे नऊ मीटरचे करावे लागणार आहेत. त्यामुळे हे रुंदीकरण हाती घेतले आहे. मात्र मैत्री इमारतीच्या रहिवाशांचे आक्षेप विचारात घेऊन आम्ही सध्या केवळ संरक्षित भिंतीपर्यंतचाच भाग घेणार आहोत. भविष्यात जेव्हा त्यांची इमारती पुनर्विकासासाठी पुढे येईल तेव्हा बाल्कनीचा भाग घेतला जाईल. रहिवाशांना लवकरच आम्ही ही बाब समजावून सांगू असेही ते म्हणाले.