नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबर रोजी रात्री दीड वाजेपर्यंतच रेस्टॉरंट-बार सुरू राहतील या आपल्या आदेशावर आपण ठाम असल्याचे सांगत त्यात कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही आणि या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असे मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी सोमवारी स्पष्ट केले.
महिलांची सुरक्षा आणि मद्यपी चालकांवर वचक बसविण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यात बदल करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही, असे सिंह यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयातही मंगळवारी याच भूमिकेवर ठाम राहणार असल्याचेही त्यांनी सूचित केले. सिंह यांच्या आदेशाविरोधात ‘आहार’ने उच्च न्यायालयात धाव घेतली असून मंगळवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याच पाश्र्वभूमीवर सिंह यांनी आपण आपल्या आदेशावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. मुंबई पोलीस आयुक्तांच्या पावलावर पाऊल ठेवत ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांनीही हॉटेल्स-बार खुली ठेवण्याच्या वेळमर्यादेबाबत सारखाचफतवा काढला आहे.
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असली तरी रात्रभर लोकांना रस्त्यावरून फिरण्यास मज्जाव करण्यात आलेला नाही, असे आणखी एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र त्याच वेळी मध्यरात्री ध्वनिक्षेपक वा संगीत वाजविण्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही बंदी असल्याचे या अधिकाऱ्याने प्रामुख्याने नमूद केले. वेळेबाबत घालण्यात आलेल्या मर्यादेचे उल्लंघन करण्यात आल्यास दंडाची वा परवाना जप्त करण्याची कारवाई केली जाईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.     –

धूम मचा ले..
नववर्ष स्वागताच्या रात्री मुंबईत तब्बल अडीच हजार पाटर्य़ाचा महापूर येणार आहे. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांपासून ते वेगवेगळ्या क्लब्जपर्यंत सगळीकडेच त्यांची धूम आहे. अडीच हजार रुपयांपासून ते अगदी १६ हजार रुपयांपर्यंत कपल आणि सिंगल एण्ट्री असलेली ही सगळी हॉटेल्स आणि क्लब्ज मंगळवारच्या रात्री गजबजणार आहेत.

रेल्वेची रात्रभर सेवा
नववर्षांनिमित्त मुंबईकडे येणारी गर्दी लक्षात घेऊन कल्याण, ठाणे आणि पनवेल येथून मध्य रेल्वे विशेष फेऱ्या सोडणार आहे. पश्चिम रेल्वेनेही ३१ डिसेंबरच्या रात्री विशेष गाडय़ांची घोषणा आधीच केली आहे.