मुंबई : राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच एमएसआरडीसी, एनएचएआय, अशा अनेक संस्थाच्या वतीने रुग्णवाहिका सेवा देण्यात येतात. या सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित जाळे व संचलन, देखरेख करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. यामुळे अतिगंभीर रुग्णांना महत्त्वांच्या तासांत रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि त्यांचे प्राण वाचविण्यासाठी जलद रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवासंदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा पुरवठादार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्याच्या रुग्णसेवेत लवकरच नवीन अत्याधुनिक १०८ ॲम्बुलन्स रुजू होणार आहेत. या सर्व रुग्णवाहिका निर्धारित केलेल्या वेळेत सेवेत रुजू करून आवश्यकतेनुसार ठिकाणे निश्चित करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

त्याचप्रमाणे नवीन अत्याधुनिक १०८ रुग्णवाहिकेसोबतच १०२, १०४, ११२ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकाही कार्यरत आहेत. एमएसआरडीसी, एनएचएआय या संस्थांच्या वतीने महामार्गावर, टोल नाक्यावर, रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. या सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क तयार केल्यास, रुग्णांना महत्त्वाच्या तासांत जलद रुग्णसेवा उपलब्ध होईल, असे मंत्री आबिटकर यांनी सांगितले. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे– बोर्डीकर, आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते.

राज्यातील रुग्णवाहिका सेवावर ‘महाराष्ट्र शासन’ असे स्पष्ट लिहिले असावे. कोणत्याही कंपनीचे नाव किंवा चिन्हे वापरू नये. पुरवठादार संस्थेने, रुग्णवाहिकेवर आपल्या कंपनीची नव्हे तर महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असल्याचे नमूद करावे. शासकीय अधिकाऱ्यांच्या मान्यता घेऊनच रुग्णवाहिकेवरील ब्रँडिंग करावे, अशा स्पष्ट सूचना आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.