मुंबई : चालू वर्षात पहिल्या तीन महिन्यांत म्हणजे जानेवारी ते मार्च, या कालावधीत पश्चिम विदर्भात २५७ तर राज्यभरात ७६७ शेतकऱ्यांनी आमत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.
राज्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढत असून, पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांत तीन महिन्यांत २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात यवतमाळमध्ये ८१, अमरावतीत ५०, अकोल्यात ४८, बुलढाण्यात ४२, वाशिममध्ये ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यातील हिंगोलीतही आत्मत्यांचे सत्र सुरूच असून प्रत्येक महिन्यात पाच शेतकरी आत्महत्या करत आहेत, हे खरे आहे का? शिवाय या शेतकऱ्यांच्या वारसांना किती मदत केली या बाबत प्रश्न विचारला होता, असा प्रश्न डॉ. प्रज्ञा सातव, सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, संजय खोडके, अमोल मिटकरी यांच्यासह अन्य सदस्यांनी उपस्थित केला.
पश्चिम विदर्भात तीन महिन्यांत २५७ आत्महत्या झाल्या असून, राज्यभरात ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे लेखी उत्तरात सांगितले. पश्चिम विदर्भातील ७६ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत तर ७४ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. १०७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती दिली. राज्यात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी ३७३ प्रकरणे पात्र तर २०० प्रकरणे अपात्र ठरली आहेत. १९४ प्रकरणे प्रलंबित तर असून, ३२७ शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.