मुंबईः राज्यातील ३० गोशाळांना पाच कोटींच्या अनुदानाची खिरापत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्यानुसार या गोशाळांना जनावारांच्या संख्येनुसार १५ ते २५ लाखांच्या दरम्यान अनुदान देण्यात आले आहे. राज्यात गोवंशीय प्राण्याच्या कत्तलीस प्रतिबंध करण्यात आल्यापासून अनुत्पादक पशुंच्या संख्येत वाढ होत आहे. या प्राण्यांचा सांभाळ करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने गोवर्धन दोवंश सेवा केंद्र योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार गोशाळा सुरू करून तेथे गाईंचा सांभाळ करणाऱ्या संस्थाना अनुदान दिले जाते.

राज्य गोसेवा आयोगाने अनुदानासाठी ४३ तालुक्यातील गोशाळांचे प्रस्ताव सरकारकडे पाठविले होते. पशूसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य स्तरीय निवड समितीने ३० गोशाळांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामध्ये पुणे जिह्यातील दोन, सोलापूरमधील पाच, अहिल्यानगरमधील चार तर अकोला, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव जिल्ह्यातील प्रत्येकी दोन गोशाळांना अनुदान देण्यात आले आहे.