रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी व्हावी याकरिता रस्ता सुरक्षेसंबंधी लवकरच नवे धोरण आखले जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ठाणे वाहतूक शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा-एक आव्हान’ या कार्यक्रमात बोलताना दिली. सुमारे ७५ टक्के अपघात मानवी चुकांमुळे घडतात.
  साध्या उपायांना बगल दिल्याने अनेकांना अपघातात जीव गमवावा लागतो. त्यामुळे रस्ता सुरक्षा अभियान राबविणे महत्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ िशदे, पोलीस आयुक्त विजय कांबळे, सह-पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण, वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी कंरदीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्या पिढीला शिकवायचे आहे, त्या पिढीला त्यांच्या भाषेतच शिकवले पाहीजे. जेणेकरून ते लवकर शिकतात. त्यामुळे लहान मुलांना ‘पोगो’ चित्रवाहिनीच्या माध्यमातून छोटा भीम, चुटकी आणि कालीया या व्यक्तीरेखांच्या माध्यमातून वाहतूकीचे धडे देण्याचा ठाणे पोलिसांचा उपक्रम चांगला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या उपक्रमामुळे वाहतूकीचे नियम पाळले जावेत यासाठी पालकांवर घरातील लहान मुलांचा दबाव वाढेल,  असेही ते म्हणाले.
महिलांच्या सुरक्षेसाठी ठाणे पोलिसांनी तयार केलेल्या ‘ट्रॉव्हल सेफ’ या नव्या प्रणालीचा वापर राज्यस्तरावर करता येऊ शकतो का, याची चाचपणी करण्यात येईल. रिक्षा, टॅक्सी, कॅब आणि रात्री कॉलसेंटरमध्ये कामावर जाणाऱ्या महिलांसाठी या प्रणालीचा वापर होऊ शकतो का, याचाही विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पोलिस अधिकारी माहिती तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करतात आणि त्यात स्वत:ची कल्पकता वापरतात, हे खूप चांगले आहे.

ठाणे पोलिसांचे उपक्रम..
वाहतुकीच्या नियमांचे बाळकडू देण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने ‘पोगो’ चित्रवाहिनीच्या माध्यमातून अ‍ॅनिमेशन फिल्म तयार केल्या आहेत. छोटा भीम, चुटकी आणि कालीया या व्यक्तीरेखांतून वाहतूकीचा संदेश देणार आहेत. तसेच रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या किंवा कॉल सेंटरमध्ये कामावर जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी ‘ट्रॅव्हल सेफ’ ही नवी प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीद्वारे महिला नेमकी कुठे आहे, याची माहिती तिच्या कुटूंबियांना घरबसल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे. याशिवाय ठाणे पोलिसांनी चारित्र्य तसेच अन्य दाखले आता ऑनलाईनद्वारे देण्याची सुविधा सुरू केली आहे. यासर्व उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

वाहतूकविषयक जनजागृती करण्यासाठी निधीची वानवा..
त्सुनामी, भुकंप, महाप्रलय यामध्ये मृत पावणाऱ्यांपेक्षा अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहतुकीसंबंधी जनजागृती महत्वाची आहे.
मात्र, त्यासाठी निधीची वानवा आहे. त्यामुळे राज्यात वाहतूक शाखेचे पोलिसांकडून जमा होणाऱ्या दंडापैकी ५० टक्के रकम वाहतूकीसंबंधी जनजागृतीसाठी मिळावा, अशी मागणी ठाणे पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे यावेळी केली. तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षेसंबंधीचा अभ्याक्रम लागू करावा, अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.