सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘५० खोके, गद्दार हाय हाय’ अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केलं. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देणाऱ्यांमध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेदेखील सहभागी झाले होते. गद्दारी करुन राज्यात सरकार आल्याचे पोस्टर यावेळी झळकावण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरेंनी आम्ही गद्दार सरकारचा विरोध करत असल्याचं म्हटलं. “ज्यांनी लोकशाहीचा खून केला त्यांच्याविरोधात आम्ही उभे असून, हे गद्दार सरकार असून कोसळणारच,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केली. हे सरकार घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि बेईमानांचं सरकार असून नक्की कोसळणार असंही ते म्हणाले.

नव्या सरकारची कसोटी; विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून; विरोधक आक्रमक

“महाराष्ट्राच्या संस्कृतीत, राजकारणात याआधी गुंडगिरीची भाषा वापरली जात नव्हती. ज्या नव्या पक्षात ते जाऊ इच्छित आहेत, तिथे ही भाषा मान्य आहे का?,” अशी विचारणा यावेळी आदित्य ठाकरेंनी केली. “मुख्यमंत्री किंवा खरे मुख्यमंत्री यांचा अंकुश राहिला नसल्यानेच गुंडगिरीची भाषा वापरली जात आहे,” असं आदित्य म्हणाले.

मी काही राजीनामा मागणार नाही, पण जनता यांना याचं स्थान दाखवून देईल. ही गुंडांची भाषा असून, महाराष्ट्रात गुंडांना स्थान नाही अशी टीका यावेळी त्यांनी केली. जनतेला धमकावणारे आमदार असे उघडपणे फिरणार असतील, तर यापुढे राज्यात कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था होईल याचा अंदाज येतो असंही ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनंजय मुंडे यांचीही टीका

“अशाप्रकारे एखादं ट्वीट करुन विरोधी पक्षाला बदनाम कऱण्याचा आणि त्यांना दाबण्याचा प्रयत्न करणं हे त्यांचं धोरण आहे. पण विरोधी पक्ष अशा कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही. महाविकास आघाडी एकजुटीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करत आहे,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.