मुंबई : पश्चिम उपनगरात रोहिंग्या आणि बांगला देशी फेरीवाल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा, अशी सूचना पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या. गोरेगाव येथील मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभाग कार्यालयात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार पार पडला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

या जनता दरबारात आमदार विद्या ठाकूर उपस्थित होत्या. तब्बल २०० हून अधिक तक्रारी नागरिकांनी प्रत्यक्षपणे सादर केल्या व त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. जनता दरबारात अवैध बांधकामे, रस्त्यावरील फेरीवाले, वाहतूक कोंडी, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या.

गोरेगाव परिसरातील अवैध लॉज व्यवसायाने नागरिकांना होणार त्रास लक्षात घेता एक समिती स्थापन करून याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही लोढा यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, शहरातील प्रत्येक विभागात अशा जनता दरबारांचे आयोजन केले जात आहे. जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचून प्रत्यक्ष तोडगा निघू शकेल. त्यानुसार हा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता.

मुंबईकरांच्या अडचणींवर जलद आणि प्रभावी उपाय करणे ही आमची प्राथमिकता आहे. जनता दरबार म्हणजे फक्त ऐकणे नाही, तर तिथेच निर्णय घेऊन लोकांना दिलासा देण आहे, असे लोढा म्हणाले.