मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचा मार्ग उच्च न्यायालयाने शुक्रवारी मोकळा केला. सदस्य नोंदणीवरून याचिकाकर्ते आणि प्रतिवादी यांनी काही मुद्यांवर सहमती दर्शवल्यानंतर न्यायालयाने त्याची नोंद घेतली व निवडणुकीविरुद्ध दाखल याचिका निकाली काढली. तसेच, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याबाबत दिलेला मनाई आदेशही मागे घेतला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे, एमसीएची निवडणूक ठरल्याप्रमाणे १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांच्यासह अन्य सदस्यांनी या निवडणूक प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच, अंतिम मतदारयादी रद्द करावी आणि दोन प्रशासक नेमावेत, अशी मागणी केली होती. मात्र, न्यायमूर्ती रियाज छागला आणि न्यायमूर्ती फरहान दुबाश यांच्या खंडपीठाने सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देताना काही अटींसह पुढील कार्यवाहीस परवानगी दिली. त्यात, सदस्य नोंदणीवरून याचिकाकर्ते आणि प्रतिवादी यांनी सहमती दर्शवलेल्या काही मुद्यांचा समावेश आहे.
त्यानुसार, १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत एक नवा अजेंडा समाविष्ट करण्यात यावा. त्या ठरावाप्रमाणे, एमसीएच्या सर्व सदस्यांनी संस्थेच्या अधिनियम ३(ए)(ड) चे पालन चार महिन्यांच्या आत करणे बंधनकारक असेल. ठराव मंजूर झाल्यास, नियमांचे पालन न करणाऱ्या सदस्यांचे प्रतिनिधी सहा महिन्यांनंतर अपात्र ठरतील. याशिवाय, हा ठराव नामंजूर झाल्यास दोन्ही पक्षकारांना पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची मुभा राहील, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले.
याव्यतिरिक्त, याचिकाकर्त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) किंवा राज्य संघटनांशी संबंधित सदस्यत्व आणि मतदान हक्कांबाबत ओम्बड्समनकडे तक्रार दाखल करण्याची परवानगी न्यायालयाने दिली. ओम्बड्समनने या तक्रारी लवकरात लवकर निकाली काढाव्यात, असे आदेश देखील न्यायालयाने याचिका निकाली काढताना आणि १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचा मार्ग मोकळा करताना दिले.
प्रकरण न्यायालयात का पोहोचले ?
घटनेचे उल्लंघन होणे आणि नियमबाह्यपणे १५५ हून अधिक क्रिकेट क्लबना मतदार यादीत समाविष्ट केल्याच्या आरोप करून याचिकाकर्त्यांनी या निवडणुकीला आव्हान दिले होते. एमसीएच्या निवडणुकीसाठी २४ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी अंतिम उमेदवार यादी जाहीर केली होती. या यादीवर आक्षेप घेऊन याचिकाकर्त्यांनी आपल्या हरकती निवडणूक अधिकाऱ्यांकडे नोंदवल्या होत्या. परंतु, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या हरकती फेटाळल्या. त्यासाठी कोणतीही कारणे न दिले नाही आणि उमेदवारांची अंतिम यादीही जाहीर केली, असा दावा याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे. तसेच, एमसीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर आपल्या हरकती फेटाळल्या याची कारणे निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेली नाहीत. त्यामुळे, या कारणांचा सविस्तर खुलासा करण्याचे आदेश संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मुख्य मागणी याचिकेत केली आहे. तथापि, प्रारुप मतदारयादीविषयी १७ ते २० ऑक्टोबर यादरम्यान आलेल्या आक्षेपांचा विचार केल्यानंतरच अंतिम यादी जाहीर केली. त्या प्रक्रियेत याचिकाकर्त्यांच्या आक्षेपांचाही विचार केल्याचा प्रतिदावा निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला होता.
म्हणून ही निवडणूक महत्त्वाची
एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या सहभाग असून त्यात भाजपचे नेते प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे. याशिवाय, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक यांनीही अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत सोमवारपर्यंत होती. त्यात मुंबई टी-२० लीगच्या अध्यक्षपदासाठी सात, कार्यकारीणी सदस्यासाठी नऊ अर्ज, तर अध्यक्षपदासाठी एकूण १४ अर्ज आले आहेत. उपाध्यक्षपदासाठी दहा, सचिवपदासाठी १०, सहसचिवपदासाठी नऊ आणि खजिनदार पदासाठी आठ अर्ज आले आहेत. त्याचबरोबर कार्यकारीणी पदासाठी ४८ अर्ज आले आहेत. येत्या १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी या सुद्धा शर्यतीत आहेत. एडलजी या एकमेव क्रिकेटपटू उमेदवार आहेत.
