मुंबई : मुंबई आणि उपनगरांत बुधवार रात्रीपासून पाऊस कोसळत होता. त्यामुळे आधीच धास्तावलेल्या मुंबईकरांचा गोंधळ हवामान विभागाच्या इशाऱ्यांनी गुरूवारी आणखी वाढवला. दिवसभर ‘ऑरेंज’ आणि ‘रेड’ अलर्टचा घोळ सुरू राहिल्यामुळे खासगी कंपन्या तसेच शाळा भरवायच्या की नाही, कर्मचारी-विद्यार्थ्यांना घरी सोडायचे की थांबवून ठेवायचे या संभ्रमातच दिवस सरला… आणि कहर म्हणजे एखादी हलकी सर वगळता शहरात पाऊसच झाला नाही.
राज्याच्या बहुतांश भागांत सध्या पावसाने मुक्काम ठोकला आहे. बुधवारी दिवसभर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. विशेषत: किनारपट्टीभागात गुरुवारी सकाळीही पावसाचा जोर होता. बुधवारी सकाळी ८:३० ते गुरुवारी सकाळी ८:३० या २४ तासांत कुलाबा केंद्रात १४२.६ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात ६०.५ मिमी पावसाची नोंद झाली. गुरूवारी सकाळी काही भागांत संततधार होती. प्रादेशिक हवामान विभागाने सकाळी ६:३० वाजता अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) असल्याचे सांगितले. त्यानंतर दुपारी १२च्या सुमारास सुधारीत अंदाज जाहीर करून अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) दिला. त्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळा भरवण्याबाबत व्यवस्थापनाचा संभ्रम उडाला. मात्र, शाळा काही निर्णयाप्रत पोहोचण्यापूर्वीच पुन्हा सुधारित अंदाज जाहीर झाला आणि इशाऱ्याचा रंग पुन्हा केशरी झाला. या काळात अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना लवकर सोडण्याचा किंवा घरून काम करू देण्याची सवलत दिली. प्रत्यक्षात यातील कोणताच ‘रंग’ पावसाने दाखवला नाही. दुपारनंतर एखादी मोठी सर वगळता बहुतांश भागांतील पाऊस ओसरला. कुलाबा केंद्रात गुरुवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सरासरी १ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात सरासरी १८ मिमी एवढ्याच पावसाची नोंद झाली.
शुक्रवारी हलक्या सरींचा अंदाज
मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जूनच्या सुरुवातीपासून पावसाने मुंबईत उघडीप दिली होती. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.