न्यायालयीन वादात घर अडकल्याने मुंबई मंडळाचा निर्णय

मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून सोडतीसाठी उपलब्ध झालेल्या मध्यम गटातील एका घरावर (संकेत क्रमांक ४६१) बृहतसूचीतील (मास्टरलिस्ट) रहिवाशाने दावा करीत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांच्या सोडतीतून दादरमधील हे घर वगळण्यात आले. न्यायप्रविष्ट असलेले हे घर सोडतीतून रद्द करण्याबाबतचे शुद्धिपत्रक शनिवारी प्रसिद्ध करण्यात आले. या घरासाठीची अर्ज विक्री-स्वीकृती बंद करण्यात आली आहे.

मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांच्या सोडतीसाठीची अर्ज विक्री-स्वीकृतीची प्रक्रिया २२ मेपासून सुरू झाली असून ही प्रक्रिया २६ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र या सोडतीतील दादर परिसरातील (मध्यम गट – संकेत क्रमांक ४६१) सावित्री निवास आणि लक्ष्मी निवासमधील घरासाठी इच्छुक असलेल्यांना आता अर्ज करता येणार नाही. हे घर सोडतीतून रद्द करण्यात आले आहे.

दरम्यान, यासंबंधीचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले होते. मंडळाने अखेर हे घर सोडतीतून वगळले असून या घरासाठीची अर्ज विक्री-स्वीकृती बंद केल्याची माहिती मंडळाच्या सह मुख्य अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी दिली. आतापर्यंत या घरासाठी काही अर्ज सादर झाले आहेत. त्यांचे काय करायचे याबाबतचा निर्णय समोवारी घेण्यात येईल, असेही धायगुडे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.