मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सर्वात मोठ्या विरार-बोळींज गृहप्रकल्पातील शेकडो घरे विक्रीवाचून रिक्त पडून आहेत. या घरांच्या विक्रीसाठी कोकण मंडळाची कसरत सुरू आहे. तर दुसरीकडे रिक्त घरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे आता मंडळाकडून या गृहप्रकल्पात जलतरण तलाव आणि क्लब हाऊस बांधून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रकल्पात जलतरण तलावासह क्लब हाऊस बांधण्यासाठी कोकण मंडळाने निविदा प्रक्रिया राबविली असून येत्या १० दिवसांत निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे. तर निविदा अंतिम झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून जूनध्ये कामाला सुरुवात करण्याचे कोकण मंडळाचे नियोजन आहे.

कोकण मंडळाचा विरार-बोळींजमधील प्रकल्प सुमारे १० हजार घरांचा आहे. हा सर्वात मोठा प्रकल्प असला तरी विक्री होत नसल्यामुळे तेथील शेकडो घरे रिक्त आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून या घरांच्या विक्रीसाठी मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विविध अनेक पर्यायांचा अवलंब करण्यात आला आहे. मात्र तरीही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता मंडळाने ‘बुक माय शो’च्या धर्तीवर ‘बुक माय होम’ संकल्पना मांडून ज्याला हवे त्याला घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार घरविक्री सुरू आहे. मात्र तरीही मोठ्या संख्येने घरे रिक्त असून त्यामुळे मंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे मंडळाने या घरांच्या विक्रीसाठी अन्य पर्यायांचा वापर करण्यात येत आहेत. आता मंडळाने या प्रकल्पात जलतरण तलाव आणि क्लब हाऊस बांधण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार – बोळींज प्रकल्पात रहिवाशांच्या सुविधांसाठी एक भूखंड राखीव आहे. याच भूखंडावर आता क्लब हाऊस आणि जलतरण तलाव बांधण्यात येणार आहे.

या प्रकल्पात अंदाजे १० हजार घरांचा समावेश असल्याने येथे राहणाऱ्यांना मुलभूत सुविधांसह इतरही मनोरंजनाच्या वा आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे मंडळाने जलतरण तलाव आणि क्लब हाऊस बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १६६५ चौरस मीटर जागेवर जलतरण तलाव आणि क्लब हाऊस विकसित करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे ४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी निविदा खुल्या करण्यात आल्या असून येत्या १० दिवसांत निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका बांधकाम कंपनीला हे काम मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरार-बोळींजमधील घरांची विविध कारणांमुळे विक्री होऊ शकलेली नाही. तर विक्री झालेल्या बहुतांश घरांमध्ये विजेते वास्तव्यास आलेले नाही. या प्रकल्पात जलतरण तलाव आणि क्लब हाऊस बांधण्याचा निर्णय घेत कोकण मंडळ या घरांकडे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या पहाडी येथील उच्च आणि मध्यम गटातील घरांचा समावेश असलेल्या प्रकल्पानंतर विरार-बोळींजमध्ये जलतरण तलाव आणि क्लब हाऊस बांधण्यात येत आहे हे विशेष.