मुंबई : म्हाडाच्या लोकशाही दिनाच्या धर्तीवर आता म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने बुधवार, २३ एप्रिल रोजी पहिला जनता दरबार आयोजित केला आहे. सोडतीतील विजेत्यांपासून ते म्हाडा वसाहतीतील रहिवाशांपर्यंत सर्वांना जनता दरबाराच्या माध्यमातून आपल्या समस्या, तक्रारी थेट मुख्य अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. जनता दरबाराच्या माध्यमातून या तक्रारींचे योग्य आणि तातडीने निवारण करण्याचा प्रयत्न मुख्य अधिकारी करणार आहेत.

दुपारी १२ ते २ दरम्यान जनता दरबार

म्हाडाशी संबंधित समस्या, तक्रारींचे निराकरण करून आपली रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली मागील वर्षापासून म्हाडा भवनात लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. या लोकशाही दिनी सर्वच विभागीय मंडळाशी संबंधित तक्रारी येतात. अशावेळी त्या त्या मंडळाशी संबंधित तक्रारींचे योग्य आणि शक्य तितक्या लवकर निवारण व्हावे यासाठी जयस्वाल यांनी विभागीय मंडळाच्या स्तरावही लोकशाही दिनाच्या धर्तीवर जनता दरबार आयोजित करण्याचे निर्देश सर्व विभागीय मंडळांना दिले होते. त्यानुसार मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचा पहिला जनता दरबार मंगळवार, २२ एप्रिल रोजी पार पडणार आहे. त्यापाठोपाठ , बुधवार, २३ एप्रिल रोजी मुंबई मंडळाचा जनता दरबार भरविण्यात येणार आहे. वांद्र्यातील म्हाडा भवनातील तिसऱ्या मजल्यावरील भारतरत्न गुलजारीलाल नंदा सभागृहात दुपारी १२ ते २ या वेळेत जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली हा जनता दरबार पार पडणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लेखी निवेदन करा

म्हाडाच्या विभागीय मंडळातील सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात मोठे विभागीय मंडळ म्हणून मुंबई मंडळ ओळखले जाते. मुंबईतील म्हाडाच्या ११४ अभिन्यासात सुमारे अडीच लाख सदनिकाधारक आहेत. मंडळ सध्या अनेक पुनर्विकास प्रकल्प राबवत आहे. त्यामुळे म्हाडा वसाहतीतील रहिवासी, बीडीडी पुनर्विकासासह म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासातील रहिवासी, म्हाडाच्या सोडतीतील विजेते अशा सर्वांना आपल्या समस्या यावेळी थेट मुख्य अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. या संधीचा लाभ घेऊन आपल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी संबंधितांनी मंगळवार, २२ एप्रिल २०२५ पर्यंत म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील कक्ष क्रमांक ४०८, सहमुख्य अधिकारी, मुंबई मंडळ यांच्या कार्यालयात लेखी निवेदने सादर करावे, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.