मुंबई : उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबईतील जेवढे रस्ते कॉंक्रीटचे होते त्याच्या पाच ते सहा पट रस्ते एका वर्षात आता होत आहेत. त्यामुळे विकासाची गती वाढली आहे. कामाची व्याप्ती वाढली आहे, असे मत मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले आहे. उपनगरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी केल्यानंतर शेलार यांनी हे मत व्यक्त केले.
मुंबई पश्चिम उपनगरातील रस्त्यांची आशिष शेलार यांनी पाहणी केली. आतापर्यंत तिनदा शेलार यांनी रस्ते कामांची पाहणी केली आहे. पश्चिम उपनगरातील पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणच्या अपूर्ण रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती समोर आली असून २० मे नंतर कोणतेही नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करू नये, तसेच ३१ मे पर्यंत रस्ते वाहतूक योग्य करा असे आदेशही आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
सोमवारी केलेल्या रस्ते पाहणीच्या दौऱ्यादरम्यान वांद्रे पश्चिम येथील १४ व्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून, रस्ता पूर्णपणे खोदून ठेवलेला असल्याचे निदर्शनास आले. कांदिवली येथील न्यू लिंक रोड आणि डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशन परिसरातील रस्त्यांचे अपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी दिले.
मालाड पूर्व येथील गोविंदभाई श्रॉफ रस्ता ते एस. व्ही. रस्त्यापर्यंतचे काम अंतिम टप्प्यात असून तो रस्ता काही दिवसांत वाहतुकीसाठी खुला होईल असेही त्यांनी सांगितले. दहिसर पश्चिम येथील रंगनाथ केसकर महामार्ग आणि रिव्हर व्हॅली रोडला जोडणाऱ्या दहिसर नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी केली.
यावेळी मंत्री शेलार माध्यमांशी बोलताना म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे येत्या तीन वर्षात मुंबईत उत्तम रस्त्यांची सोय नागरिकांसाठी केली जाईल. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबईतील रस्त्यांची जी दयनीय स्थिती होती त्याच्या तुलनेत फक्त एका वर्षात आम्ही ६० टक्क्यांहून अधिक रस्त्यांची सुधारणा पूर्ण केली आहे, असेही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
आता नवीन रस्ता खोदू नका, २० मे नंतर काँक्रीटीकरण थांबवा, कारण पावसाळ्याच्या तोंडावर केलेल्या तात्पुरत्या कामांमुळे रस्ते पुन्हा उखडण्याचा धोका असतो. सर्व रस्त्यांची कामे ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करा. जे रस्ते खोदून ठेवले आहेत त्याचे डांबरीकरण करुन ते वाहतूकीस खुले होतील असे पाहा. डांबरीकरण करताना रस्ते पावसाळ्यात उखडून खड्डे पडणार नाहीत, याची काळजी घ्या. तसेच सध्या लावण्यात आलेले दुभाजक हटवा, डेब्रिज, खडी, माती तातडीने हटवण्यात यावेत, गटारांमध्ये गेले डेब्रिज आणि मातीही काढा, अशा सूचना यावेळी मंत्री शेलार यांनी दिल्या.
रस्त्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, आमदार विद्या ठाकूर, आमदार मनिषा चौधरी, माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, माजी नगरसेविका हेतल गाला आणि स्थानिक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई
जे कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करतील त्यांच्यावर कारवाई होणारच असाही इशारा शेलार यांनी दिला. तसेच अर्धवट काम करणाऱ्यांनाही दंडात्मक कारवाई केली जाईल असाही इशारा त्यांनी दिला आहे.