मुंबई : कल्याण-डोंबिवली-तळोजादरम्यान प्रस्तावित ‘मेट्रो १२’ मार्गिकेला नवी मुंबईतील बांधून सज्ज असलेल्या बेलापूर-पेंधर या मार्गिकेशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत कल्याण ते बेलापूरदरम्यान ये-जा करण्यासाठी प्रवाशांना सुलभ आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे.

नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या शहरांना जोडण्यासाठी एमएमआरडीएने ‘कल्याण-डोंबिवली-तळोजा’ ही ‘मेट्रो १२’ मार्गिका आखली आहे. २०.७५ किमी लांबीच्या आणि १८ स्थानकांचा समावेश असलेल्या मार्गिकेच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या होत्या. या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत करण्यात येणार होते. या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. अंदाजे ५,८६५ रुपये इतक्या खर्चाच्या या कामासाठी १९ निविदा सादर झाल्या होत्या. पण आता ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तळोजापर्यंत ‘मेट्रो १२’ नेल्यानंतरही पुढे बेलापूपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना उलटसुलट प्रवास करावा लागू शकतो, ही बाब विचारात घेऊन एमएमआरडीएने ‘मेट्रो १२’ आणि नवी मुंबईतील ‘बेलापूर – पेंधर मेट्रो १’ मार्गिका एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. किमान दोन किमीने मार्गिकेचा विस्तार करण्यात येणार आहे. पेंधर मेट्रो स्थानकात या दोन्ही मार्गिकांची अदलाबदल करून पुढे प्रवास करता येणार आहे. नव्या विस्तारीत मार्गिकेचे पुन्हा आरेखन करून बांधकामासाठी नव्याने निविदा मागवण्यात येणार आहेत.