मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमावर्ती भागांमध्ये विशेषत: बोरिवली, मालाड आणि कांदिवली परिसरात माकडांचा वावर लक्षणीयरित्या वाढला आहे. गेल्या चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदा माकडांकडून नागरिकांवर हल्ल्यांच्या आणि माकडे स्वत: जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
राष्ट्रीय उद्यानाच्या जवळच वाढत असलेल्या झोपडपट्ट्या, वसाहती, इमारती आणि विकासकामांमुळे वन्य प्राण्यांचा अधिवस धोक्यात येऊ लागला आहे. त्यामुळे अन्नाच्या शोधात माकडांच्या टोळ्या वस्तीच्या दिशेने येऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून जंगलाच्या आसपास असलेल्या गृहसंकुलात माकडांचा शिरकाव झाल्याच्या अनेक तक्रारी प्राणीमित्र आणि तसेच वन विभागाकडे येऊ लागल्या आहेत.
काही प्रकरणांमध्ये माकडांनी नागरिकांना ओरबाडणे, अंगावर झेप घेणे, घरांमध्ये घुसून अन्न हिसकावणे अशा घटना घडत आहेत. परिसरात माकडांचा वावर प्रचंड वाढला आहे. स्थानिक रहिवासी यासंदर्भात संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी करीत आहेत. परंतु त्यावर ठोस उपययोजना होत नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर परिसराजवळील नागरी वस्तीतही माकडांच्या टोळ्या उपद्रव करीत असल्याचे प्राणीविषयक संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
दरम्यान, माकडांच्या टोळ्या खाद्यपदार्थांच्या शोधात मानवी वस्ती येतात. माकडांना अन्न देणे बंद करायला हवे. सहज अन्न मिळते तेव्हा त्यांचे नैसर्गिक वर्तन बदलते आणि माणसांना धोका निर्माण होतो, असे मत रेस्क्यूइंक असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअरचे (रॉ) संचालक पवन शर्मा यांनी व्यक्त केले.
माकड दिसल्यास त्यांना खाद्यपदार्थ दिले जातात. त्यामुळे माकडांना जंगल सोडून शहरातील रस्त्यावर खाद्यासाठी येण्याची सवय लागते. याचबरोबर शहरातील दाट वस्तीची सवय नसलेली माकडे काही वेळा वीजेचा धक्का लागून किंवा इतर काही कारणांमुळे मृत्युमुखी पडतात. मागील काही महिन्यांत ठाणे आणि मालाड परिसरात वीजेचा धक्का लागून माकडांचा मृत्यू झाल्याची माहिती शर्मा यांनी दिली. गृहसंकुलात येणाऱ्या माकडांना काही रहिवासी खाद्यपदार्थ देतात. मात्र, यामुळे गृहसंकुलातील इतर रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. खायला मिळत असल्याने माकडांचा वावरही वाढतो. त्यामुळे प्रामुख्याने माकडांना खायला देणे टाळावे, असा सल्ला प्राणीप्रेमींनी दिला.
जानेवारी ते जून या कालावधीत संस्थेने जवळजवळ ५० हून अधिक माकडांना जीवदान दिले. यापैकी काही माकडे अपघातात जखमी झाली होती. तर गृहसंकुलातील रहिवाशांनी केलेल्या तक्रारीवरून काही माकडांना पकडण्यात आले होते. ही संख्या मागील काही वर्षांपेक्षा जास्त आहे. – पवन शर्मा, संचालक, रेस्क्यूइंक असोसिएशन ऑफ वाईल्ड लाईफ वेल्फेअर