मुंबई : मोसमी पाऊस बुधवारी मराठवाडा आणि विदर्भात दाखल झाला. मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मोसमी पाऊस दाखल झाला. तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांचा भागही मोसमी पावसाने व्यापला. त्याचबरोबर संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश व्यापून मोसमी पाऊस पुढे सरकला आहे. दरम्यान, राज्यात शनिवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत काही ठराविक भागात पावसाचा जोर राहील अन्यथा मुसळधार पावसाची शक्यता या दिवसांत नसल्याचे हवामान विभागाने सांगितले.

मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने मोसमी वाऱ्यांची वाटचाल वेगाने सुरु आहे. मोसमी पावसाने बुधवारी राज्यात पुढील वाटचाल करून मराठवाडा आणि विदर्भ गाठले. दक्षिण भारतातही प्रगती केली आहे. तसेच संपूर्ण कर्नाटक राज्य व्यापले. आंध्र प्रदेशचा उरलेला भाग व्यापला आहे. तेलंगणाच्याही काही भागांत मोसमी पाऊस दाखल झाला आहे. तसेच पश्चिम मध्य बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग मोसमी पावसाने व्यापला आहे. दरम्यान, मोसमी वाऱ्यांची सीमा बुधवारी मुंबई, अहिल्यानगर, तेलंगणातील अलिदाबाद, त्रिपुरातील अगरतळा आणि आसाममधील गोलपारा या भागात होती. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे. यामुळे पुढील दोन दिवसांत मोसमी वारे आणखी काही भागात प्रगती करण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारीही काही ठिकाणी पावसाचा जोर कायम होता. मात्र, गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही ठराविक भागात मुसळधार पाऊस होईल. शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शनिवारी आणि रविवारी दक्षिण कोकण, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईत मुसळधार

मुंबईत बुधवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस पडत नव्हता. त्यानंतर सायंकाळी ४ वाजल्यानंतर शहर तसेच उपनगरांत जोरदार पावसाने हजेरी लावली. साधारण एक ते दीड तास हा पाऊस कोसळत होता. त्यानंतर पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान, मुंबईसह ठाणे पालघर भागात गुरुवारी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रत बुधवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत २९.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.२ मिमी पावसाची नोंद झाली. वातावरणात आर्द्रता अधिक असल्यामुळे मुंबईतील उकाडा वाढला आहे.