मंत्रिमंडळाची मान्यता; ३३ हजार अतिरिक्त घरे

मुंबई : गोरेगाव येथील मोतीलाल नगर या म्हाडा वसाहतींचा विशेष बाब म्हणून पुनर्विकास करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

मोतीलाल नगर १, २ व ३ येथे सुमारे ५० हेक्टर जागेवर साधारण ३,७०० गाळे व १६०० झोपडय़ा आहेत. या ठिकाणी पुनर्विकासास मुबलक जागा उपलब्ध असल्याने मूळ रहिवाशांच्या पुनर्वसनानंतर साधारणपणे ३३ हजार अतिरिक्त घरे उपलब्ध होतील. त्यामुळे यास ‘विशेष प्रकल्पा’चा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रकल्पांतर्गत निवासी वापराकरिता प्रतीगाळा १६०० चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्यात येईल. मात्र, या १६०० चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापैकी विनियम ३३(५) च्या तरतुदींनुसार अनुज्ञेय असलेल्या ८३३.८० चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळासाठी येणारा बांधकाम खर्च प्रकल्पासाठीच्या कं पनीला करावा लागेल. तसेच, अनिवासी वापराकरिता प्रतीगाळा ९८७ चौ.फु. इतके बांधकाम क्षेत्रफळ मंजूर करण्यात येईल. या ९८७ चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापैकी ५०२.८३ चौ.फु. बांधकाम क्षेत्रफळापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळासाठी येणारा बांधकाम खर्च कं पनीला करावा लागेल.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा प्रकल्प म्हाडा स्वत: पूर्ण करणार असल्याचे ठरले. मात्र म्हाडाला हा प्रकल्प राबविणे सद्य:परिस्थितीत शक्य नसल्याने संस्थेची नियुक्ती करून अप्रत्यक्षपणे म्हाडाला प्रकल्प राबवावा लागणार आहे. त्याकरिता काही अटींसह पूर्वतयारी सुरू होईल. त्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

महानिर्मितीच्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प

महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. उस्मानाबाद, लातूरसह महानिर्मितीच्या विविध औष्णिक वीजप्रकल्पांच्या रिकाम्या जागेवर एकू ण१८७ मेगावॉट क्षमतेचे तर विदर्भातील विविध ठिकाणी एकू ण ३९० मेगावॉट क्षमतेचे असे एकू ण ५७७ मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

वीज जोडण्या कापण्याबाबत नाराजी

वीज कंपन्यांची थकबाकी वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच, थकबाकीदार शेतीपंपाच्या वीज जोडण्या कापण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध दर्शविण्यात आला. यावर पुढील मंगळवारी वीज कं पन्यांच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीचे आयोजन के ले आहे.

खासगी विकासक नेमण्यास सुभाष देसाई यांचा विरोध

गोरेगावच्या मोतीलाल नगर येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास खासगी विकासकांमार्फत करण्यास विरोध करत पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याची मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केल्याचे समजते. पत्रा चाळीच्या विकासाचा अनुभव पाहता मोतीलाल नगरचा विकास करताना खासगी विकासकाची नेमणूक करू नये, असे देसाई यांनी स्पष्ट केल्याचे समजते.