मुंबई : मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर) स्थापन केले जाणार आहे. या अध्यासन केंद्राच्या स्थापनेसाठी नवी दिल्ली येथे मुंबई विद्यापीठ आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या डॉ. आंबेडकर फाऊंडेशन यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्याय, समता, मानवी हक्क आणि आर्थिक सक्षमीकरणाशी निगडित विचार शैक्षणिक व धोरणात्मक पातळीवर प्रसारित केले जातील. शिक्षण व रोजगार क्षेत्रातील धोरणांचा वंचित घटकांवर होणारा परिणाम अभ्यासणे, कौशल्य विकासासंबंधित उपयुक्त योजना सुचविणे तसेच शिक्षणातील प्रवेश, गुणवत्ता व समावेशकता यावरही विशेष भर या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या सामंजस्य कराराप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादव, डॉ. आंबेडकर फाउंडेशनचे सदस्य सचिव व्ही. अप्पाराव, फाउंडेशनचे संचालक मनोज तिवारी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या संचालिका प्रा. मनिषा करणे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारसरणी आणि दूरदृष्टी देशभर पोहोचविण्यासाठी डॉ. आंबेडकर फाऊंडेशन सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. विद्यापीठांमध्ये नव्याने स्थापन झालेल्या आंबेडकर अध्यासन केंद्राच्या माध्यमातून धोरणाधारित संशोधन, लोकजागृती आणि सामाजिक न्याय, समानता, वंचित घटकांचे सक्षमीकरण व संविधानिक मूल्यांवरील शैक्षणिक चर्चेला अधिक बळकटी देतील असा आशावाद व्यक्त केला.
तसेच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव अमित यादव यांनी शिक्षण, रोजगारयोग्यता आणि समाजातील वंचित घटकांच्या कल्याणाशी निगडीत सार्वजनिक धोरण हे आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख केंद्रबिंदू असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानावर आणि त्यांच्या आधुनिक सामाजिक व कायदेशीर प्रश्नांशी निगडिततेवर बहुविषयक संशोधन प्रोत्साहित करण्यात विद्यापीठांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी म्हणाले की, ‘सामाजिक न्याय व समतेच्या तत्त्वांवर आधारित धोरणांची निर्मिती करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असून या माध्यमातून शिक्षण, रोजगार व समतेसंबंधित धोरणांचा अभ्यास करून न्याय्य व सर्वसमावेशक समाज घडविण्याचा प्रयत्न होईल. सध्या मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र कार्यान्वित असून या केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
आता अध्यासन केंद्राच्या स्थापनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक देवाण घेवाणीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. तसेच बहुविद्याशाखीय अभ्यास व संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील संविधानिक विविध तरतुदींचा प्रभाव, वंचित घटकांचे शैक्षणिक प्रगतीचे प्रवाह, तसेच शैक्षणिक व रोजगारातील दरी कमी करण्यासाठी राबविलेल्या योजना आदी विविध गोष्टींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
त्याचबरोबर एम. ए. सोशल पॉलिसी, एम. ए. बुद्धीस्ट स्टडीज यासारख्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह संशोधन प्रकल्प, डॉक्टरेट व पोस्ट डॉक्टरेट अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. लवकरच डॉ. आंबेडकर फाऊंडेशन आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात अध्यासन केंद्राच्या स्थापनेसाठी करार केला जाणार आहे. या अध्यासन केंद्राच्या अंतर्गत प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि दोन डॉक्टरेट फेलो नियुक्त केले जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे या अध्यासन केंद्राच्या स्थापनेसाठी वार्षिक रुपये ७५ लाख रुपयांचे अनुदानही मंजूर करण्यात आले आहे.