मुंबई: प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली खार पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघांविरोधात पोलिसांनी राजद्रोह, राज्य सरकारविरोधात प्रक्षोभक विधान करणे आणि सरकारला आव्हान देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्याची सुनावणी २९ एप्रिलला होणार आहे.

राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि कलम १२४ अ नुसार राजद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारविरुद्ध प्रक्षोभक विधान करणे, सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना सांताक्रुझ येथील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर रविवारी दुपारी त्यांना पोलीस बंदोबस्तात वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. परिसरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या वेळी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला होता. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचे कलम वाढवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती घरत यांनी केली. राणाच्या वतीने त्यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी युक्तिवाद केला. त्यांनी पोलिसांच्या कोठडीला विरोध करताना त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवावे, अशी विनंती केली. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर नवनीत आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या वेळी न्यायालयाने तपास अधिकारी आणि वकिलांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. करोना चाचणीनंतर नवनीत राणा यांना भायखळा तर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात पाठवण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी एक गुन्हा

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध खार पोलिसांनी आणखी एका गुन्ह्याची नोंद केली आहे. शनिवारी कारवाईसाठी गेलेल्या खार पोलिसांशी राणा दाम्पत्याने अरेरावीची भाषा करून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी खार पोलीस ठाण्यातही पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत राणा दाम्पत्यावर पोलिसांनी हुज्जत घालून सरकार कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद केली.

सोमय्या प्रकरणातही गुन्हा

राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यात सोमय्या जखमी झाले होते. त्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण या प्रकरणातील कलमांबाबत सोमय्या यांनी नाराजी व्यक्त केली. सोमय्या यांच्या चालकाविरोधातही भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खार पोलीस ठाण्यात आलेल्या सोमय्या याच्या चालकाने भरधाव वेगाने चालवून दोघांना किरकोळ जखमी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

१६ शिवसैनिकांना अटक व जामिनावर सुटका

राणा दाम्पत्याच्या खार येथील घरासमोर जमा होऊन जोरदार घोषणाबाजी करून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी काही शिवसैनिकांविरुद्ध खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत १६ शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. मात्र हा गुन्हा जामीनपात्र असल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

राणा दाम्पत्याला कुणाचे पाठबळ?’

नाशिक: राणा दाम्पत्याच्या कृतीमागे नक्कीच कोणाचा तरी हात असून त्याशिवाय ते असे धाडस करू शकत नाही. मुंबईतील वातावरण बिघडविण्यास त्यांना कुणी पाठबळ दिले. याची  पोलीस सखोल चौकशी करणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. अटकेतील व्यक्तीला भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याचा किरीट सोमय्या यांना कुठलाही अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रविवारी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील दीक्षांत संचलन आणि गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना गृहमंत्र्यांनी खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठणाच्या दिलेल्या इशाऱ्यावर आक्षेप घेतला.

राणा दाम्पत्याचा अट्टहास का ? – अजित पवार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हनुमान चालीसाचे पठण घरी किंवा मंदिरात करता येईल. लोकशाहीने प्रत्येकाला तो अधिकार दिला आहे. पण, त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये, असे बजावत अजित पवार यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. हे दाम्पत्य बराच काळ एका नेत्याच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा पठणावर अडून राहिले. पोलिसांनी पूर्वकल्पना देऊनही हा अट्टहास का, असा प्रश्न त्यांनी केला.