मुंबई : मुंबई महानगरपालिका एक श्रीमंत महापालिका असूनही मुंबईकरांना चांगल्या सोयीसुविधा मिळत नाहीत. महापालिकेच्या विविध विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे. नालेसफाईच्या नावाखाली भ्रष्टाचार होत आहे, रस्ते क्रॉंक्रीटीकरणात भ्रष्टाचार, घनकचरा व्यवस्थापनातही भ्रष्टाचार होत असून या सर्व कामांची सखोल चौकशी करा व मुंबईकरांना चांगल्या सोयीसुविधा द्या, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने गुरुवारी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली. यावेळी आमदार अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत मुंबईच्या विविध नागरी सुविधा व इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, मुंबईतील मालमत्ता कराचा प्रश्न, शिक्षण, आरोग्य, मुस्लिम कब्रस्तान, घनकचऱ्याचे नियोजन यासह विविध मुद्द्यांवर आयुक्तांशी चर्चा केली. घनकचऱ्याचे नियोजन दिसत नाही, अनेक भागात कचरा तसाच पडून असतो, त्यासंदर्भात अनेक तक्रारी येत आहेत. मुंबईकरांना कोणत्याच सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. बेस्टचे खच्चीकरण चालू आहे आणि स्मार्ट मीटरच्या नावाखाली बेस्टचा हा विभाग अदानीला देण्याचे घाटत आहे.
परिवहन विभागही तोट्यात दाखवून तिकीट दर वाढवले पण त्याचा परिणाम प्रवासी संख्या घटण्यात झाला आहे. मुंबईतील सर्वसामान्य लोकांची बेस्ट ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाच मोडीत काढली जात आहे. बेस्टला सक्षम करण्याची गरज असून त्यासाठी राज्य सरकार व पालिकेने एक हजार कोटी रुपये दिले पाहिजेत. देवनारच्या कत्तल खान्याच्या मुद्द्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर राज्य सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन पालिका आयुक्त गगराणी यांनी दिल्याचे यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
पावसाळापूर्व नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे पहिल्याच पावसांत मुंबई तुंबली. दरवर्षीच्या स्थितीत अद्याप सुधारणा झालेली नसून यामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. प्रशासन ८२ टक्के नालेसफाईचा दावा करीत असली तरी फक्त ३० ते ४ ० टक्केच नालसफाई झाली आहे. म्हणजेच अजूनही ६० टक्के नालसफाई झालेली नाही. रस्ते कामेही अर्धवट स्थितीत आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी खासदार गायकवाड यांनी केली.
शताब्दी रुग्णालयाच्या खाजगीकरणाला विरोध
गोवंडीतील नव्याने उभारलेल्या शताब्दी रुग्णालयाच्या खाजगीकरण प्रस्तावास विरोध करण्यात आला आहे. याआधी बोरीवलीतील भगवती रुग्णालयाचा खाजगीकरण प्रस्ताव रद्द करण्यात आलेला आहे. यापुढेही खासगी करणाला विरोध केला जाणार असल्याचे खासदार गायकवाड यांनी माध्यमांशी बोलतनाना सांगितले.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस सक्रीय
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच आता मुंबईच्या नागरी प्रश्नांवर काँग्रेसपक्ष सक्रीय झाला असल्याची चर्चा वर्षा गायकवाड यांच्या भेटीनंतर सुरु झाली आहे.