मुंबई : दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्या लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने यंदा राज्यभरात एक हजार ४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या २१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान धावणार आहेत. मात्र, या गाड्यांतून प्रवास करण्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. महामंडळाने दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ही वाढ होणार आहे. ती ३१ ऑक्टोबरपर्यंत ती लागू असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>>मुंबईच्या रस्त्यावर १० हजार बेवारस वाहने ; ४१५७ वाहने पालिकेने हटवली, सर्वाधिक वाहने ग्रँट रोड परिसरात

दरम्यान, एसटी महामंडळाने ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास करण्याची सवलत दिली आहे. तर ६५ ते ७५ वर्षांदरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात जेष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

हेही वाचा >>>मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत दिव्यांचा लखलखाट ; सुशोभिकरणात रोषणाईवर भर

दिवाळीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे गावी किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत आखतात. यंदा दिवाळीला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे नियमित बस फेऱ्यांबरोबरच एक हजार ४९४ जादा बसगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्याटप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद विभागातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येणार आहेत.

१० टक्के हंगामी भाडेवाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटी महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला दिला आहे. त्यानुसार गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरुपाची भाडेवाढ केली जाते. यावेळी दिवाळीत २० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून अकरा दिवसांसाठी १० टक्के भाडेवाढ लागू असणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार असून लवकरच त्याची माहिती महामंडळाकडून प्रवाशांना दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.