मुंबई : हार्बर मार्गावरील टिळकनगर-चेंबूर दरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना बुधवारी सकाळी २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या देहाचा काही भाग लोकलच्या चाकात अडकल्याने टिळकनगर -चेंबूरदरम्यान बराच वेळ लोकल उभी होती. बऱ्याच वेळाने लोकल मार्गस्थ झाली आणि मानखुर्द येथे पोहचताच तरुणाचे कपडे लोकलमध्ये अडकल्याचे लक्षात आले. त्यामुळे मानखुर्द येथे पुन्हा लोकल थांबली. या घटनेमुळे संपूर्ण हार्बर मार्गिका खोळंबली. परिणामी, अनेक लोकल रद्द कराव्या लागल्याने रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली.

बुधवारी सकाळी ९.१९ वाजता एक २५ वर्षीय तरूण टिळकनगर-चेंबूरदरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलखाली आला. त्यात या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, आरपीएफ जवान, रेल्वे पोलीस दाखल झाले. लोकलच्या चाकाखाली अडलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात आले. त्याच्या देहाचे तुकडे झाल्याने लोकल सकाळी ९.३६ वाजेपर्यंत तिथेच उभी होती. त्यानंतर, लोकल मार्गस्थ झाली. परंतु, मानखुर्द रेल्वे स्थानकात लोकल आली असता, देहाचा काही भाग लोकलखाली अडकल्याची शक्यता रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफ जवानांनी व्यक्त केली. त्यामुळे सकाळी ९.४६ ते १० दरम्यान लोकलची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यावेळी तरुणाचे कपडे लोकलमध्ये अडकल्याचे निदर्शनास आले.

अडकलेले कपडे काढून लोकल मार्गस्थ झाली. परंतु, सकाळी गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने आणि दोन वेळा लोकल थांबविल्याने संपूर्ण हार्बर मार्गिका विस्कळीत झाली. त्यामुळे अनेक लोकल रद्द कराव्या लागल्या. महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात २० ते २५ मिनिटे लोकल दाखल झाली नव्हती. तसेच लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. दरम्यान, २५ वर्षीय तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याच्या कुटुंबियाचा शोध सुरू आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जानेवारी २०२१ ते मे २०२५ या कालावधीत एकूण १० हजार २३९ प्रवाशांचा रेल्वे प्रवासादरम्यान विविध कारणांमुळे मृत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहेत. मध्य रेल्वेवरील ३,१५१ आणि पश्चिम रेल्वेवरील १,९७० प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे मार्गावर सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना होत असून प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी उद््वाहन, सरकते जिने, पादचारी पूल उभारण्यात येत आहेत. तसेच, रेल्वेच्या दोन्ही दिशेला सुरक्षा जाळी आणि सुरक्षा भिंत उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर वारंवार उद्घोषणा करून प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.