मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने नागालँडमधून तिघांना अटक केली. त्यांना पुढील तपासासाठी मुंबईत आणण्यात येणार आहे.
मुंबईत राहणाऱ्या एका व्यावसायिकाचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी केली होती. व्यावसायिकाच्या सुटकेसाठी दीड कोटी रुपये खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीद्वारे पोलिसांनी माग काढण्यास सुरुवात केली. यानंतर खंडणीसाठी आलेल्या मोबाइल क्रमाकांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यात फोन नागालॅंडमधून करण्यात आल्याचे आढळले. संशयितांचा शोध घेण्यासाठी नागालँडमध्ये एक विशेष पोलीस पथक पाठवण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी नागालॅंडमधून तिघांना ताब्यात घेतले आणि व्यावसायिकाची सुटका केली.आरोपी तेथील स्थानिक रहिवासी आहेत. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आरोपींना त्वरित विमानतळावर आणले.
सदर व्यावसायिकाने व्यवसाय करारात २५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. या कथित फसवणुकीबाबत नागालँडमधील स्थानिक पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. दरम्यान, आरोपींनी केलेल्या दाव्याची पोलीस सत्यता पडताळत आहेत.