आतापर्यंत भारतीय वेधशाळेचा संबंध हा बहुतांशरीत्या मान्सूनच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यापुरता मर्यादित होता. देशाची अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून असल्याने वेधशाळेचे प्रमुख कार्य म्हणजे पावसाचे आगमन व त्याचे प्रमाण यांचा अंदाज देण्याचे होते. आताही मान्सून हा भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कार्याच्या मध्यवर्ती आहे. मात्र तरीही वर्षभरात वेगवेगळ्या ऋतूंमधील तापमान हेदेखील सातत्याने चच्रेत राहू लागले आहे. पावसासोबत वेधशाळेने तापमानाबाबतही अधिकाधिक विस्तृत टिप्पणी करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय वेधशाळेच्या गेल्या शंभरहून अधिक वर्षांच्या कार्यकाळात या वेळी पहिल्यांदाच उन्हाळ्यातील तापमानाचा दीर्घकालीन (एप्रिल ते जून) अंदाज व्यक्त करण्यात आला, हे त्याचेच उदाहरण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिक हवामानबदल आणि तापमानवाढ या पाश्र्वभूमीवर भारतातील विविध शहरांचादेखील २००५ पासून तापमानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आला. देशातील सर्वात प्रगत शहर असलेल्या मुंबईचा अभ्यास त्यात असणे साहजिकच होते. वेधशाळेच्या संशोधकांसोबतच आयआयटी, पर्यावरणाबाबत काम करणाऱ्या सामाजिक संस्था, भूगोल अभ्यासक यांनी वेगवेगळे निकष व परिमाण वापरून तापमानबदलाचा अभ्यास केला. त्यांचे निष्कर्षही त्याप्रमाणे बदलले. तापमानवाढीचा वेग, दिशा, ऋतू याबाबत काही मतमतांतरे असली तरी एक घटक सर्वच अहवालात सातत्याने अधोरेखित करण्यात आला आणि तो म्हणजे मुंबईचे तापमान वाढते आहे. त्यातही आजूबाजूच्या परिसरापेक्षा अर्थनगरीतील तापमानातील वाढीचा वेग अधिक आहे. शहरातही विशिष्ट परिसरातील तापमान हे इतर भागांपेक्षा अधिक दिसते आहे. नागरी उष्णता बेट म्हणजेच ‘अर्बन हीट आयलंड’ ही आंतरराष्ट्रीय संकल्पना मुंबईलाही लागू पडत आहे.

मुंबई वेधशाळेने केलेल्या अभ्यासात शहरातील वांद्रे, अंधेरी हे परिसर इतर भागांपेक्षा तप्त असल्याचे दिसून आले होते. पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाच्या २०१५ च्या एका अभ्यासानुसार रत्नागिरी या कोकण किनारपट्टीवरील शहरापेक्षा मुंबईतील तापमानवाढीचा वेग दुप्पट आहे. पुणे वेधशाळा आणि कॅनडातील वेस्टर्न आँटॅरिओ विद्यापीठ यांनी १९६९ ते २००९ या काळात कुलाबा आणि सांताक्रूझ येथील रात्रीच्या तापमानातील फरकाचा अभ्यास केला. त्यानुसार सूर्यास्तावेळी या दोन्ही ठिकाणांतील तापमानात साधारण ०.५ अंश से. एवढाच फरक होता. मात्र रात्र वाढत गेल्यावर हा फरक ३ ते ४ अंश से.पर्यंत वाढत असल्याचे दिसले. १९७१ ते ८० मध्ये अशा प्रकारे तीन अंश से.पेक्षा अधिक तापमानफरक असलेल्या रात्रींची संख्या ६५ होती. त्यानंतरच्या दशकात ती २५ वर आली. मात्र १९९१-२००० या दशकात तब्बल ९५ रात्री कुलाब्याचे तापमान सांताक्रूझपेक्षा तीन अंश से.ने जास्त होते. २००१-०९ या नऊ वर्षांत अशा ९० रात्रींची नोंद झाली. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात हा बदल अधिक स्पष्ट दिसला. समुद्र हा तापमान नियंत्रणातील महत्त्वाचा घटक असला तरी तो कायमच मुंबईच्या बाजूला होता. त्यामुळे रात्रीच्या उष्म्यात झालेल्या वाढीसाठी इतर घटकांचा विचार करणे आवश्यक ठरते. बांधकामासाठी वापरले जाणारे सिमेंट, काँक्रीट, लाद्या उष्णता शोषून घेतात व रात्रीच्या वेळी ती हवेत सोडतात. त्यामुळे हा फरक दिसत असल्याचे संशोधकांचे मत आहे.

आयआयटी दिल्लीने केलेल्या अभ्यासानुसार दिवसा व रात्रीच्या तापमानातील फरक कमी होतो आहे. २००१ मध्ये दिल्लीच्या कमाल व किमान तापमानात सरासरी १२.४८ अंश से.चा फरक होता. २०११ मध्ये हा फरक १०.३४ अंश से.वर आला आहे. आयआयटी मुंबईच्या ‘सेंटर फॉर स्टडीज इन रिसोर्स इंजिनीअिरग’च्या प्राध्यापकांनी केलेल्या अभ्यासात तर दिल्लीपेक्षा मुंबईतील उष्णता बेटांची संख्या अधिक असल्याचे म्हटले आहे. उपग्रहाकडून घेतल्या गेलेल्या प्रतिमा तसेच माहितीआधारे हा प्रबंध करण्यात आला. त्यात अंधेरी, कुर्ला या भागांत तापमान अधिक असल्याची नोंद करण्यात आली. या अभ्यासानुसार अंधेरी व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील भाग यांच्या एकाच वेळी घेतलेल्या तापमानात तब्बल १३ अंश से.पर्यंतचा फरक दिसला. तापमानातील एवढय़ा फरकाबाबत इतर संशोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी इमारतींनी वेढलेल्या परिसरातील तापमान निश्चितच अधिक असते याबाबत एकवाक्यता आहे. दिल्लीतील ‘द इंजिनीअिरग अ‍ॅण्ड रिसोर्स इन्स्टिटय़ूट’ (टेरी) या संस्थेने मांडलेल्या अहवालातही पंधरा वर्षांत दिल्ली व मुंबईतील सरासरी तापमानात दोन ते तीन अंश से.ने वाढ झाल्याचे दिसते. नासाच्या उपग्रहातील नोंदीनुसार या दोन्ही शहरांतील तापमान त्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण परिसरापेक्षा रात्री पाच ते सात अंश से. अधिक होते.

खरे तर समुद्राच्या सान्निध्यामुळे मुंबईचे तापमान मराठवाडा, विदर्भातील जिल्हय़ांप्रमाणे ४० अंश से.च्या पलीकडे सहसा जात नाही. मात्र तरीही सांताक्रूझ व कुलाबा येथील हवामान केंद्रातील नोंदींएवढे ते सुसहय़ही नसते, हे सामान्य मुंबईकराच्याही लक्षात आले आहे. हवेतील बाष्पाच्या प्रमाणामुळे उकाडा जाणवतो हे खरे असले तरी त्यापेक्षाही या शहराच्या विकासाचा वेग हे कारण जास्त लागू पडत असल्याचे सर्वच अभ्यासकांचे मत आहे. सिमेंट-काँक्रीटचे रस्ते, काचांनी आच्छादलेल्या इमारतींचे जाळे, गाडय़ांमधून बाहेर पडणारा धूर, घर-कार्यालये थंड ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वातानुकूलित यंत्राचे गरम हवेचे फवारे इ.इ. या सर्व घटकांमुळे मुंबईची हवा तापते आहे. भारतात विविध ठिकाणी सध्या आलेल्या उष्णतेच्या लाटांसाठी कदाचित नसíगक बदल कारणीभूत असतीलही, मात्र शहरातील तापमानवाढीस आपणच जबाबदार आहोत.

prajakta.kasale@expressindia.com

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai heat island
First published on: 04-06-2016 at 02:04 IST