मुंबईची खालावत चाललेली हवेची गुणवत्ता चिंतेची बाब झाली असतानाच आता मुंबईतील हिरवळ झपाट्याने कमी होत असल्याचे समोर आले. द इंडियन एक्सप्रेसने माहितीच्या अधिकाराखाली मुंबई महानगरपालिकेकडे मागितलेल्या याबाबतच्या आकडेवारीत धक्कादायक माहिती समोर आली. मागच्या सहा वर्षात विविध विकास प्रकल्पांसाठी मुंबईतील २१,०२८ वृक्ष तोडण्यात आल्याचे या माहितीमधून समोर आले आहे. मेट्रो, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड, सांडपाणी प्रक्रिया संयंत्र आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोड अशा प्रकल्पासाठी सर्वाधिक झाडे तोडण्यात आल्याचे समोर आले आहे.

मुंबई मनपाने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ आणि २०२३ या काळात तब्बल २१,९१६ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. मात्र या झाडांचा जगण्याचा दर फारच कमी आहे. २४ पैकी केवळ नऊ प्रभागांमधील झाडं जगल्याची आकडेवारी प्राप्त झाली आहे. या आकडेवारीनुसार, नऊ प्रभागांमध्ये ४,३३८ झाडांचे पुनर्रोपण केले गेले, त्यापैकी केवळ ९६३ (२२ टक्के) झाडे जगू शकली आहेत.

Water stock in Mumbai Dams : मुंबईच्या धरणांत केवळ ३२ टक्के

मुंबईकरांसाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे शहरातील वृक्षगणना २९,७५,२८३ असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाश्यानुसार ही वृक्षगणना २०११ सालातील आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, झाडे तोडण्याच्या ९० टक्के परवानग्या या पायाभूत सुविधा आणि विकास कामांसाठी दिल्या गेल्या आहेत. मागच्याच आठवड्यात बदली झालेले मुंबई मनपाचे माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले की, मागच्या सहा वर्षात अनेक विकास प्रकल्पांना गती मिळाली. हे प्रकल्प गेल्या अनेक वर्षांत प्रलंबित होते. मात्र मागच्या तीन-चार वर्षांत प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी झाडे तोडण्याच्या परवानग्या दिल्या गेल्या. चहल पुढे म्हणाले की, जगात कोणत्याही शहरात पायाभूत सुविधा वाढवित असताना शहरातील वृक्षांवर कुऱ्हाड चालवावी लागली आहे. मुंबईच्या बाबतीत, आम्ही महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोड प्रोमेनेडच्या एकत्रित ३०० एकर जागेवर मुंबईचे सेंट्रल पार्क तयार करूण या नुकसानाची भरपाई करणार आहोत.

मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या २५७ पैकी केवळ ११९ झाडांचेच पुनर्रोपण, एमएमआरसीएलचा उच्च न्यायालयातील समितीसमोर प्रस्ताव

मुंबईतील हिरवळ कमी होत असल्याबाबत पर्यावरण तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी चिंता व्यक्त केली आहे. आयआयटी मुंबईचे प्राध्यापक रघू मुर्तूगुड्ड यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, वृक्षांची संख्या कमी होत असल्यामुळे तापमानात वाढ होत असल्याचे दिसत आहे. अरबी समुद्राचे तापमान वाढल्यामुळे पावसाच्या चक्रात बदल पाहायला मिळत आहे. जर मुंबईतील वृक्षतोड आपण रोखू शकलो तर आगामी काळात हवामानाचे बदलते चक्र काही प्रमाणात रोखता येऊ शकते. तापमान नियंत्रणात ठेवण्यास वृक्ष महत्त्वाचे योगदान देतात, हे विसरून चालणार नाही.

दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर्षी नवीन वृक्षगणना करणार असल्याची प्रतिक्रिया द इंडियन एक्सप्रेसकडे दिली आहे. पुढच्या पाच वर्षात मुंबईतील हिरवळ ४० टक्क्यांनी वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.