मुंबई : मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून विविध भागांत पाणी साचले आहे. ऐन उन्हाळ्यात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या पावसामुळे रेल्वेची वाहतूक संथगतीने सुरू असून नागरिकांना शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीत मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मेट्रो ३’लाही पावसाचा फटका बसला. मेट्रो ३ वरील वरळीतील आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी साचलेल्याने यंत्रणांची तारांबळ उडाली. रेल्वे कोलमडल्याने आणि रस्ते जलमय झाल्याने मेट्रो ३ मधून प्रवास सुकर होईल असा मुंबईकरांना आशावाद होता. मात्र आचार्य अत्रे चौक भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करीत बाहेर यावे लागले.

मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानक मार्गिकेतील आरे – बीकेसी पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी बीकेसी – आचार्य अत्रे चौक, वरळी हा दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र भुयारी मेट्रो स्थानकाच्या लोकार्पणानंतरच्या पहिल्याच पावसात मेट्रो सेवेचा बोजवारा उडाला. मुसळधार पाऊस कोसळू लागताच वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात पाण्याची गळती होऊ लागली. स्थानकात पावसाचे पाणी साचले. त्यामुळे या वरळीतील भुयारी मेट्रो स्थानक जलमय झाले असून प्रवाशांना पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागले.

भुयारी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्यामुळे काही वेळ मेट्रोचे दरवाजे उघडले गेले नाहीत, त्यामुळे काही वेळ प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. काही वेळानंतर मेट्रोचे दरवाजे उघडले आणि प्रवासी बाहेर पडले. आचार्य अत्रे चौक या भुयारी मेट्रो स्थानकावर पाणी साचल्याची छायाचित्रे आणि चित्रफिती समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून नागरिकांकडून मेट्रो प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे.

दरम्यान, वरळीतील भुयारी मेट्रो स्थानकात धबधब्यासारखे पाणी पडत होते. पाणी साचल्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून स्वयंचलित जिनेही बंद करण्यात आले. तसेच बाहेरील कचराही पाण्यासोबत मेट्रो स्थानकात शिरला होता. त्यामुळे वरळीतील भुयारी मेट्रो स्थानकाला बकाल स्वरुप आले. पाणी साचल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रशासनाचे म्हणणे

मुंबईत कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे डॉ. अॅनी बेझंट मार्गालगतच्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन येण्या-जाण्याच्या मार्गावर पाणी शिरले. सांडपाणीनिःसारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे जलसंरक्षक भिंत कोसळली. ही भिंत येण्या-जाण्याच्या मार्गाची संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात आली होती. दरम्यान, पाणी शिरलेला प्रवेश मार्ग व बाहेर जाण्याचा मार्ग सध्या बांधकामाधीन असून प्रवाशांसाठी खुला झालेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वरळी ते आचार्य अत्रे चौक स्थानकांदरम्यानची मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र आरे जेव्हीएलआर – वरळीदरम्यान मेट्रो सेवा सुरळीत सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन, अभियांत्रिकी व सुरक्षा पथकाने घटनास्थळी तात्काळ कार्यवाही सुरू केली असून बाधित भागाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असून सर्व प्रणाली पूर्णपणे कार्यक्षम झाल्यानंतरच सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे ‘एमएमआरसी’ने स्पष्ट केले.