मुंबई : भारतीय हवामान विभागाने मुंबईला १६ ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका प्रशासनाच्या सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर (ऑन ग्राउंड) कार्यरत आहेत. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचा सखलभाग जलमय झाला आहे. आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी, अनेक ठिकाणचे सखलभाग जलमय झाले असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानेही मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त, उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागाचे सहायक आयुक्त, तसेच सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयात तात्काळ हजर राहून समन्वय साधावा. तसेच, गरजेनुसार योग्य त्या आपत्कालीन उपाययोजना कराव्यात, असे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी, अभियंते, पंप ऑपरेटर आणि आपत्कालीन पथके सतर्क आहेत.
पर्जन्य जलवाहिनी यंत्रणा, मलनि:सारण व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येत असून, पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत. असे असले तरीही, आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील मदत क्रमांक १९१६ वर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. गरज भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील मदत क्रमांक १९१६ वर संपर्क साधावा आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे.