मुंबई : मुंबई शहर व उपनगर परिसरातील नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका विशेष मोहीम हाती घेणार आहे. २९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत विभागीय पातळीवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ल्यांमधील तरंगता कचरा संकलित करणे व त्याची विल्हेवाट लावणे या उद्देशाने ही मोहीम राबवली जात आहे.
मुंबईतील लहान व मोठ्या नाल्यातील पावसाळापूर्व गाळ काढण्याची कामे आधीच झालेली असली तरी मुंबई महापालिकेने नाल्यातील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘विशेष स्वच्छता मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, या कामासाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली आहे. या विशेष स्वच्छता मोहिमेत निष्काळजीपणा अथवा हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिला आहे.
मुंबई महापालिकेने आठ दिवसांची विशेष नाले स्वच्छता मोहीम हाती घेतली असून या कालावधीत मुंबईत विविध नाल्यांतील तरंगता कचरा हटवला जाणार आहे. या कालावधीत मुंबईतील प्रत्येक विभागातील (वॉर्ड) प्रमुख नाले (कांदळवन क्षेत्र वगळून) तसेच, नाल्याभोवतालचा परिसर, उघडी गटारे यातील कच-याचे संकलन केले जाणार आहे. या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे मनुष्यबळ, स्वयंसेवी संस्थांचे कामगार तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग असेल. विशेष मोहीम कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नाल्यातील कचरा काढणे व विल्हेवाट लावण्याची कार्यवाही केली जाईल. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अभियंता आणि परिरक्षण विभागाचे अभियंता हे विभागातील कोणत्या नाल्यांतून कचरा काढायचा, याची निश्चिती करतील. स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यांत्रिक स्वच्छता यंत्रे, कचरा उचलणारी साधने, डंपर, जेसीबी, पाण्याचे टँकर तसेच फायरएक्स उपकरणे यांचा समन्वयाने वापर करण्यात येणार आहे.
या मोहिमेत झाडलोट करणे, टाकाऊ वस्तू हटविणे, कचरा संकलन करणे तसेच संपूर्ण परिसर स्वच्छ धुऊन काढणे या उपक्रमांचा समावेश असेल. पर्जन्यजल वाहिनी विभाग यांच्याद्वारे काढण्यात आलेल्या तरंगत्या कच-याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या मार्फत केली जाणार आहे.
मुंबईतील अनेक छोट्या – मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेल्या कच-यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. अनेक भागातील नाले नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. मुंबईकर नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा न टाकता तो कचरा कुंडीतच टाकावा. जेणेकरुन कचरा अडकून नाले तुंबणार नाहीत, पाण्याचा प्रवाह सुरळीत सुरू राहिल, असे आवाहन देखील डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.