दिवा आणि पारसिक बोगदा या दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी सकाळी २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू होती. या दरम्यान गाडय़ा ताशी २० किलोमीटरच्या वेगेने चालवल्या जात होत्या. मात्र यामुळे एकही सेवा रद्द न झाल्याचे रेल्वे प्रशासने सांगितल़े मध्य रेल्वेवर दिवा आणि पारसिक बोगदा या दरम्यान रुळाला तडा गेल्याचे मंगळवारी सकाळी ८.५६ वाजता निदर्शनास आले. त्यानंतर गाडय़ा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने स्थानकांवर प्रवासी ताटकळत उभे होते. अखेर दुपारी १२च्या सुमारास हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ा संध्याकाळपर्यंत उशिराने धावत होत्या.
याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांना विचारले असता हा बिघाड फार मोठा नसल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेरुळ तातडीने दुरुस्त करण्यात आले असून कोणतीही सेवा रद्द केली नाही, असेही त्यांनी सांगितले.
शिधापत्रिका कार्यालयातील सात लाचखोर कर्मचाऱ्यांना अटक
मुंबई : शिधापत्रिकेमधील नाव कमी करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या गोवंडी-शिवाजीनगर येथील शिधापत्रिका कार्यालयातील शिधापत्रक अधिकारी-निरीक्षकासह सात कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. यात तीन महिलांचा समावेश आहे.
शिधापत्रिका अधिकारी शामू मेलप्पा धोत्रे, निरीक्षक सुजाता विठ्ठल सावंत, लिपिक प्रदीप सुखलाल पाटील, लक्ष्मी दीपक ढगे, शिपाई प्रशांत पांडुरंग पेजे, सहाय्यक शिधापत्रक अधिकारी अनिरूद्ध दिगंबर कुलकर्णी आणि कार्यालयाबाहेरील आणखीन एक महिला आशा दिलीप सोनावणे अशा सात जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली.
माथाडी कामगार आज संपावर
नवी मुंबई : राज्य सरकारने माथाडी कामगारांच्या मागण्यांना लावलेल्या वाटय़ाच्या अक्षदा आणि आगामी विधान सभेच्या पाश्वभूमीवर सरकार कोंडीत पकडण्याची व्युव्हरचना आखण्यात आली असून शासनाचे प्रलंबित मागण्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियने बुधवारी एक दिवशीय राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. नवी मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापुर, नाशिक, लातूर, पुणे, खेड मंचर आदि कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सुमारे ८० हजार माथाडी कामगार सहभागी होणार असल्याने या समित्यांमधील रोजची करोडो रूपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. माथाडी कामगारांच्या नगरविकास, गृह.पणन,कामगार व अन्य खात्यांशी संबधीत प्रश्नांची वांरवार आश्वासने देउ देखील सोडवणूक न झाल्याने शासनाचे लक्ष या मागण्यांकडे पुन्हा एकदा वेधण्यासाठी लाक्षणिक बंद पुकारण्यात आल्याचे माहिती युनियनचे सरचिटणीस आमदार नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. कृषी उत्त्पन्न बाजार समिती बंद राहणार असून यात माथाडी कामगार, न्हावा-शेवा मधील कामगार , स्टील मार्केट मधील कामगार, बिटीश कालीन रेल्वे धक्कयावर काम करणार कामगार, ट्रान्सपोर्ट कामगार आदि ठिकाणी काम करणारे कामगार या आंदोलनामध्ये सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.