मुंबई : मुंबईमध्ये दिवसेंदिवस सायबर गुन्हे वाढत असून नागरिकांनी मोबाइलवरून आर्थिक व्यवहार करताना जागरूक राहावे, असे आवाहन मुंबईचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे. दरम्यान, मुंबई पोलीस दलामार्फत सायबर सुरक्षेविषयी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर समाज माध्यमावर जनजागृती करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमुद केले.
मुंबई २०२१ मध्ये दोन हजार ८८३ सायबर गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी केवळ ४५५ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. दाखल झालेल्या केवळ १६ टक्के गुन्ह्यांचा तपास पोलिसांना करता आला आहे. सायबर गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण २०२० मध्ये केवळ ९ टक्के होते. त्या तुलनेत २०२१ मध्ये सुधारणा झाली असली तरी ते प्रमाण फार कमीच आहे.
सायबर गुन्हे वाढत असल्याने त्यावर उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्या गोष्टी टाळल्या तर, सायबर गुन्ह्याच्या चक्रात अडकणार नाही, याची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत फणसळकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले होते. ट्विटरवरील मुंबई पोलिसांच्या खात्यावरून सायबर सुरक्षेबाबत माहिती देण्यात येत आहे. ऑनलाईन पेमेंट करताना कोणती सावधगिरी बाळगावी, कोणत्या गोष्टी करू नये, याची माहिती देण्यात येत आहे.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी जागरुकतेची गरज आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी अन्य उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र नागरिकांनी जागरुक असणे गरजेचे आहे, असे संदेश समाज माध्यमावर प्रसारित करण्यात येत आहेत.
मोबाइल पिन आणि यूपीआय पिन वेगळा असावा
यूपीआयशी संबंधित कोणतीही माहिती कुणालाही देता कामा नये. पिनची गरज केवळ रक्कम हस्तांतरित करण्यासाठी असते, रक्कम खात्यात जमा करण्यासाठी नाही. कोणतेही संशयास्पद व्यवहार झाल्यास, खात्यावरील यूपीआय सेवा त्वरित दिसणार नाही असा पर्याय कार्यान्वित करावा. संशयास्पद संदेश आणि फोनबाबत तक्रार करावी, असे आवाहन मुंबई पोलिसांनी समाज माध्यमावर केले आहे.