मुंबईः सायबर फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील बनावट कॉल सेंटरविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून इतर ११ आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. याप्रकरणी आठ मोबाइल फोन, आठ सिमकार्ड जप्त करण्यात आले असून या कारवाईमुळे देशभरातील १६ हून अधिक गुन्ह्यांची उकल झाली आहे.
शीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तक्रारदारांना राष्ट्रीयकृत बँकेच्या नावाने २८ ऑगस्ट २०२४ रोजी दूरध्वनी आला होता. त्यात आरोपींनी क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याबाबत विचारून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. त्यानंतर गोपनीय माहिती मिळवून क्रेडिट कार्डद्वारे चार लाख ५४ हजार रुपयांचे ऑनलाईन व्यवहार करण्यात आले. याप्रकरणी शीव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहित कलम ३१८ (४), ३१९ (२) व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा कलम ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपासात आरोपी दिल्ली येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय खाडे व त्यांच्या पथकाने दिल्लीत जाऊन ११ जणांना ताब्यात घेतले. आरोपी बनावट कॉल सेंटरमध्ये काम करीत असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणातील मुख्य आरोपी मनजीत कुमार महावीर सिंह हा बनावट कॉल सेंटर चालवत होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. उर्वरित आरोपींना नोटीस देण्यात आली. आरोपी कॉल सेंटरमधून लोकांना मोबाइलवर संपर्क साधून ते बँकेतून बोलत असल्याचे सांगायचे. तसेच त्यांच्या क्रेडिट कार्डची व्यवहारांची मर्यादा वाढवून देतो असे सांगून त्यांना मोबाइलवर लिंक पाठवायचे. त्याद्वारे क्रेडिटकार्डमधून बेकायदा व्यवहार केले जायचे. अशा प्रकारे आरोपींनी अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे.
याप्रकरणी मनजीत सिंहला अटक केल्यानंतर न्यायालयापुढे हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून आठ मोबाइल फोन, आठ सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. तसेच गुन्ह्यातील फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी चार लाख १७ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपी टोळीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील १६ हून अधिक ऑनलाईन तक्रारी सायबर काईम पोर्टलवर दाखल आहेत. त्यात आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.